बुट्ट्या विकायला आल्या अन् दीड क्विंटल काजू पळविल्या
तुरमुरी गावातील प्रकाराने गोंधळ : आता सोन्याबरोबर काजू लंपास करण्याच्या घटना
वार्ताहर/उचगाव
चार महिला बुट्ट्या विकण्याचा बहाना करत गावात शिरल्या आणि जादा दराने काजू विकत घेऊ, अशी बतावणी करत दीड क्विंटल काजू हातोहात लांबविली. सदर घटना तुरमुरी गावात घडल्याने एकच गोंधळ माजला. नागरिकांनी अशा महिलांपासून सतर्क राहण्याची वेळ निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती अशी की, तुरमुरी गावात सोमवारी चार महिला बुट्ट्या विकण्याचा बहाना करत शिरल्या आणि काजू विकत घेऊ, अशा आरोळ्या ठोकत गावात फिरू लागल्या. गावातील रमेश चलवेटकर यांच्या घरामध्ये महिला एकटीच होती. त्यांच्या घरी काजूची पोती भरलेली होती. काजू विकण्यासाठी म्हणून त्यांच्यासमोर बुट्टीने आणत वजन करत होत्या. यावेळी भरलेल्या पिशव्या एक एक महिलेने गल्लीच्या बोळातून दुसऱ्या गल्लीत नेत दीड क्विंटल काजू हातोहात लांबवली.
याचा थांगपत्ताही त्यांना लागला नाही. अखेर आपणाला काजूच नको, असे सांगत त्या महिला निघून गेल्या. सदर महिला निघून गेल्यानंतर पुन्हा चलवेटकर यांनी काजू पोत्यामध्ये भरण्यासाठी सुरू केले. मात्र त्यामध्ये दीड क्विंटल काजू कमी पडल्याचे दिसून येताच त्यांनी तातडीने त्या महिलांची शोधाशोध केली. पण तोपर्यंत चारही महिला पसार झाल्या होत्या. बेळगावच्या पश्चिम भागात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दररोज काजू विकत घेणारे अनेक लोक, महिला येत असतात. यासाठी नागरिकांनी सतर्क राहून अशा भामट्यांपासून सावध राहावे, असे तुरमुरी गावातील काही नागरिकांनी कळविले आहे. सदर चारही महिला तुरमुरी बसस्थानकावरील एका हॉटेलमध्ये थंड पेय पिण्यासाठीही गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. सदर महिलांचा तातडीने शोध घेण्याची मागणी महिला वर्गाने केली आहे.