विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून
पणजी : राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आज दि. 12 जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचे अभिभाषण होणार असून अधिवेशन शुक्रवार दि. 16 पर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवशी केवळ राज्यपालांचे अभिभाषण एवढेच कामकाज असेल. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत कामकाज सल्लागार समितीचे अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील. दरम्यान संपलेल्या वर्षात राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना ठरलेल्या हडफडेतील बर्च क्लबला लागलेल्या आगीत तब्बल 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या घटनेचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात व्हावा व त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी पक्षांनी केली आहे.
मात्र त्यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्या घटनेचा उल्लेख अभिभाषणात असेल की नाही याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, बर्च दुर्घटनेसह अन्य कित्येक विषय आणि प्रकल्पांवरून राज्यात आंदोलने सुरू आहेत. त्यापैकी चिंबल येथील युनिटी मॉल विरोधात सुरू असलेले प्रखर आंदोलन, करमळी येथील मेगा हाऊसिंग प्रकल्पास होत असलेला विरोध, गोव्यातील जमिनी उत्तर भारतीयांना विकण्याचे प्रकार अमर्याद वाढल्याचा आरोप करून सुरू झालेली आंदोलने, तुये इस्पितळाच्या मुद्यावरून सुरू असलेले साखळी उपोषण, या सर्व मुद्यांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यातल्या त्यात बर्चसंबंधी चर्चेच्या मुद्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.