मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ!
पत्रकार परिषदेत जगदीश शेट्टर यांचा विश्वास
बेळगाव : भाजपला सर्वत्र भरघोस पाठिंबा मिळत असल्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास डळमळीत झाला असून मतदारांना प्रलोभने दाखविली जात आहेत. परंतु, या प्रलोभनांना बळी न पडता भाजप मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सदाशिवनगर येथील भाजप माध्यम केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टर यांनी विकासकामांची माहिती दिली. रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने पत्रकार परिषदेतून आपल्या कार्याची माहिती दिली. मागील महिनाभरापासून मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. अर्ज भरताना 50 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. पंतप्रधानांच्या सभेला 1 लाखाहून अधिक मतदार उपस्थित होते. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे आमदार, माजी आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य, तालुक्यातील पदाधिकारी यांनी पद्धतशीरपणे प्रचार कार्य राबविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची इच्छा गावागावात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. माजी खासदार कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांतून विमानतळ, रेल्वेस्थानक यांचा विकास, राणी चन्नम्मा विद्यापीठाला 10 कोटी रुपयांच्या अनुदानाची मंजुरी, विमानतळाच्या टर्मिनलसाठी 310 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव शहरासह मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय भाजपने बाळगले आहे. बेळगाव शहराला दुसऱ्या राजधानीचा दर्जा मिळणे, सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिराचा विकास तसेच देवस्थानसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग, रामदुर्ग येथील शबरी मंदिराचा विकास, बैलहोंगल येथे राणी चन्नम्मांचे राष्ट्रीय स्मारक, गोकाक येथील धबधब्याचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शेट्टर यांनी सांगितले. यावेळी खासदार मंगला अंगडी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, महानगर अध्यक्षा गीता सुतार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, प्रवक्ते एम. बी. जिरली, राजेंद्र हरकुनी, उज्ज्वला बडवाण्णाचे, हणमंत कोंगाली यासह इतर उपस्थित होते.