शिरगाव दुर्घटनेतून काही बोध घेणार का?
शिरगावची श्री लईराई मातेची जत्रा यंदा अनुचित घटनेने अनेकांना धक्का देऊन गेली. या जत्रेत यंदा चेंगराचेंगरीचा प्रकार घडून त्यात 6 जणांना नाहक आपला प्राण गमवावा लागला आहे. अशी दुर्घटना घडण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात असून भविष्यात अशी घटना पुन्हा घडता कामा नये याकरीता प्रशासनाने जातीने लक्ष घालून उपाययोजना करण्याची गरज आहे.
शिरगाव श्री लईराई मातेच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन सहा जणांचा बळी गेला. ज्या सहा जणांचा बळी गेला ते कुणाचे तरी वडिल, कुणाची तरी आई, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहिण, काका, मामा होते. त्यांच्या जाण्याने त्या सहा कुटुंबांना जबरदस्त धक्का बसलाच, त्याच बरोबर संपूर्ण गोवा हादरला. छोट्याश्या गोव्यात अशा प्रकारे चेंगराचेंगरी होऊन बळी जाऊ शकतात हे या घटनेतून स्पष्ट झाले. या घटनेतून आता आम्ही सर्वजण काही बोध घेणार का? की, काही दिवसांनंतर ही घटना विसरून जाणार...
शिरगावच्या जत्रोत्सवाला कित्येक वर्षांची परंपरा आहे. या जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री देवी लईराई व धोंड करीत असलेले अग्निदिव्य. हे अग्निदिव्य पाहण्यासाठीच दरवर्षी या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. संपूर्ण गोव्यातून हजारोंच्या संख्येने धोंड सहभागी होत असतात. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती धेंडाचे व्रत स्वीकारतो, तेव्हा घरात एक उत्साही वातावरण असते. त्यामुळे साहजिकच धोंडाच्या घरातील मंडळी जत्रोत्सवाला आवर्जुन उपस्थिती लावते. धोंड, त्यांचे कुटुंबिय व नातेवाईक तसेच जत्रेला उपस्थित राहणारे भाविक यामुळे शिरगावात प्रचंड मोठी गर्दी होत असते. येथील जागा अपुरी पडते. हे गेल्या अनेक वर्षाचे चित्र आजही कायम आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही.
दरवर्षी होणाऱ्या जत्रोत्सवाचे वैशिष्ठ्या म्हणजे लाखो भाविक आवर्जून भेट देतात. त्यात कोणताच बदल होत नाही. दरवर्षी धोंडांची व भाविकांची संख्या वाढत जात असल्याने, या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात ठोस अशी उपाययोजना यापूर्वीच आखायला पाहिजे होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आलेले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान समिती व सरकारी यंत्रणा यांची जबाबदारी खुप मोठी असते. निदान येथून पुढे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान समिती व सरकारी यंत्रणेला कठोर निर्णय घ्यावे लागतील.
शिरगावची जत्रा सोडल्यास गोव्यात इतर ठिकाणी जत्रोत्सव चार-पाच दिवस चालतो, त्यामुळे भाविकांची एकाच दिवशी गर्दी होत नाही. भाविक शक्य त्या प्रमाणे जत्रोत्सवाला उपस्थिती लावून श्रींचे दर्शन घेऊन जातात. शिरगावात जत्रोत्सव (अग्निदिव्य) एकाच दिवशी होत असल्याने भाविक एकाच दिवशी गर्दी करतात. ही गर्दी टाळणे तसे शक्य नसले तरी गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यावर आतापासूनच उपाय योजना आखावी लागणार आहे.
यंदाच्या जत्रोत्सवात सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, भाविकांची व धोंडांची संख्या लाखोंच्या घरात गेल्याने, पोलिस यंत्रणा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरली असेच एकूण चित्र आहे.
गेल्या वर्षी या जत्रोत्सवात अशीच चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा बळी गेल्याची माहिती समोर आली. जर गेल्या वर्षी असा अनुभव होता तर देवस्थान समिती व सरकारी यंत्रणा का सतर्क झाली नाही असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या ठिकाणातील रस्तेही अत्यंत अरूंद आहेत. त्या रस्त्याच्या बाजूलाच दुकाने-स्टॉल्स थाटण्यास मान्यता दिल्याने समस्येत आणखीन भर पडली. चेंगराचेंगरीत सहा जणांचे बळी गेल्यानंतर देवस्थान समितीने जत्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रस्त्याच्या बाजूची दुकाने-स्टॉल्स हटविण्यास सांगितले. तसेच इतर भागातून येणाऱ्या भाविकांना उपस्थिती लावू नये असे आवाहन करण्यात आल्याने, शेवटच्या दिवशी गर्दी-धक्काबुक्की टाळण्यास आखलेली योजना यशस्वी झाली.
चेंगराचेंगरीत सहा जणांचा बळी गेल्यानंतर सरकारने सत्य शोधन समिती स्थापन केली. या समितीचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. पुढील दोन-तीन दिवसांत तो उपलब्ध होईल, अशी आशा आहे. एकदा अहवाल आला की त्या अहवालातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. ही दुर्दैवी घटना का घडली व त्याला जबाबदार कोण हे या अहवालातून स्पष्ट होईल असा अंदाज बांधला जातोय. त्याच बरोबर भविष्यात कोणत्या उपाययोजना आखाव्यात यावरही प्रकाश टाकला जाण्याची शक्यता आहे.
आम्ही जत्रोत्सवाला जातोय हे देवाच्या दर्शनासाठी, देवाचा आर्शीवाद घेण्यासाठी हुल्लडबाजी करण्यासाठी नव्हे. ही भावना जर मनात ठेवली असती आणि शिस्त व संयम ठेवला असता तर चेंगराचेंगरी झाली नसती. मात्र, या चेंगराचेंगरीचे जे व्हिडिओ व्हायरल झाले, त्यातून शिस्त-संयम या गोष्टी कुठेच दिसून आल्या नाहीत. ही बाब मात्र गंभीर आहे, हे लक्षात घ्यायला हवे. उलट हुल्लडबाजीमुळेच हा प्रकार घडल्याचे जाणवते आहे. आता एकमेकांना दोष देऊन काही साध्य होणार नाही. भविष्यात अशा घटना कुठेच घडणार नाहीत याची दक्षता घेणे व उपाय योजना काढणे हाच त्याला पर्याय होय.
महेश कोनेकर