30 लाख रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे युवांना आश्वासन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. याचदरम्यान तीन टप्प्यांमधील मतदानानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मोठे आश्वासन दिले आहे. आम्ही सत्तेवर आलो तर भारत सरकार 15 ऑगस्टपर्यंत विविध शासकीय विभागांमध्ये 30 लाख रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. एका व्हिडिओ संदेशात काँग्रेस खासदाराने देशाच्या युवांना एक आवाहन केले आहे. पुढील 4-5 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील, कारण निवडणूक आपल्या हातातून निसटून चालल्याचे त्यांना कळले आहे. मोदी पंतप्रधान होणार नाहीत, याचमुळे आता 4-5 दिवसांसाठी लोकांचे लक्ष विचलित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते काहीतरी ड्रामा करतील, परंतु युवांनी स्वत:चे लक्ष विचलित होऊ देऊ नये. बेरोजगारी एक मोठा मुद्दा आहे. नरेंद्र मोदींनी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्यांनी नोटाबंदी, चुकीचा जीएसटी आणला आणि अदानीसारख्या लोकांची सेवा केल्याचे राहुल गांधी यांनी या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. इंडिया आघाडी 4 जून रोजी सरकार स्थापन करेल आणि 30 लाख रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत सुरू होईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.