राजस्थानलाही मिळणार ‘योगी’?
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बाबा बालकनाथ यांचे नाव आघाडीवर
वृत्तसंस्था/ जयपूर
हरियाणाच्या रोहतक येथील बाबा मस्तनाथ मठाचे महंत बाबा बालकनाथ यांचे नाव राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यांच्यासोबत राजघराण्याच्या सदस्य दीया कुमारी, राज्यवर्धन राठौड, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे नावही चर्चेत आहे. बाबा बालकनाथ आणि शेखावत यांना तातडीने दिल्लीत पाचारण करण्यात आल्याची चर्चा असली तरीही संसदेचे अधिवेशन सुरु झाल्याने ते राष्ट्रीय राजधानीत पोहोचले असण्याची शक्यता आहे.
तिजारा मतदारसंघात बाबा बालकनाथ यांनी विजय मिळविल्याने आणि मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने बाबा मस्तनाथ मठात उत्साहाचे वातावरण होते. राजस्थानमधील सत्तेच्या हालचालींना अंतिम स्वरुप मिळाल्यावर महंत बालकनाथ हे मठात येतील असे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात ना!
बालकनाथ हे संसदेत नजरेस पडल्यावर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी तुम्ही राजस्थानचे मुख्यमंत्री होणार आहात ना असे म्हटले आहे. यावर बालकनाथ यांनी स्मितहास्य करत प्रतिसाद दिला आहे. आम्ही सेवेसाठी तयार आहोत असे त्यांनी नमूद केले आहे.
निर्णयाकडे नजर
ज्या खासदारांनी राजस्थानात विधानसभा निवडणूक लढविली आहे, ते आमदारच राहतील, त्यांना संसद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. नियमानुसार विधानसभा निवडणुकीत विजयी होणाऱ्या खासदारांना पुढील 14 दिवसांमध्ये विधानसभा किंवा संसद सदस्यत्वापैकी एकाची निवड करावी लागते. राजस्थानात भाजपने 7 खासदारांना उमेदवारी दिली होती. यातील 4 जण विजयी झाले आहेत.
वसुंधरा राजेंच्या निवासस्थानी हालचाली गतिमान
निवडून आलेल्या आमदारांसाठी स्नेहभोजन
राजस्थानात भाजपला बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निवासस्थानी निवडून आलेल्या आमदारांची ये-जा वाढली आहे. जयपूरमधील राजे यांच्या निवासस्थानी समर्थक आमदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांसाठी राजे यांनी प्रचार केला होता, तेच या स्नेहभोजनात सामील झाले आहेत. तर काही आमदार शिष्टाचार भेटीनंतर राजे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. सोमवारी रात्रीपर्यंत 25 हून अधिक आमदारांनी राजे यांची भेट घेतली होती. स्वत:सोबत अधिक संख्येत आमदार असल्याचे दाखवून देण्याचा हा वसुंधरा राजे यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. याद्वारे त्या पक्षनेतृत्वावर मुख्यमंत्रिपद देण्यासाठी दबाव आणत असल्याची चर्चा आहे.