राष्ट्रीय महामार्ग-66चा मुद्दा संसदेत मांडणार : विरियातो
मालपेतील घटनेमुळे निकृष्ट कामे उघडकीस आल्याचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
पणजी - पत्रादेवी ते पर्वरी राष्ट्रीय महामार्ग 66 च्या विस्तारीकरणाच्या कामात अनेकांचा जीव गेला आहे. मालपे-पेडणे येथील रस्त्याच्या बाजूकडील संरक्षकभिंत कोसळल्यामुळे भाजपच्या सत्ताकाळातील निकृष्ट कामे उजेडात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग-66चा मुद्दा आपण संसदेत प्रकर्षाने मांडणार आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.
मालपे-पेडणे येथील संरक्षकभिंत कोसळल्यानंतर या घटनेला पूर्णपणे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप खासदार विरियातो यांनी केला. ते म्हणाले, सातत्याने भूस्खलन तसेच रस्ते खचण्याचे प्रकार यामुळे भाजप कुटुंबाचा सदस्य असलेल्या कंत्राटदाराची निकृष्ट कामे उघडकीस आली आहेत. उत्तरेचे खासदार श्रीपाद नाईक यांचे मौन चिंताजनक आहे.
राज्यातील भाजप सरकारला केंद्रातून कोट्यावधी ऊपयांचा निधी गोव्याच्या विकासासाठी दिला जातो. परंतु या विकासकामात खरेच हा निधी किती वापरला जातो, हा एक गहन प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.