कोकणातील फळ बागायतदारांच्या नुकसानी संदर्भात लक्षवेधी मांडणार : आ. निलेश राणे
वेंगुर्ले येथील शेतकरी बागायतदार शिष्टमंडळाने घेतली आमदार राणेंची भेट
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटनेच्या वतीने आंबा काजू नुकसानी संदर्भात शासनाकडून भरीव नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी शेतकरी बागायतदार शिष्टमंडळाने आज रविवारी दि.१ मार्च रोजी चिपळूण येथे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी याबाबत अधिवेशनात आपण लक्षवेधी मांडणार असून शासनाकडून शेतकरी बागायतदार यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी वेंगुर्ले येथील संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे, आंबा बागायतदार कुमा ठाकूर, चेतन कुबल, माजी सभापती अभिषेक चमणकर तसेच गिरीश मांजरेकर, नितेश मयेकर, मंदार गावडे, सिद्धार्थ नरसुले, सखाराम ठाकूर, सुजित चमणकर, वैभव फटजी, मंदार परब यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते.