मळेवाड येथील विद्युत पोलवरील तुटलेल्या फ्युजला काठीचा आधार
महावितरणला दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का ?
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात बऱ्याच ठिकाणी सद्या विद्युत वाहिन्यांवर विद्युत पोलवर झाडी वाढून ते धोकादायक स्थितीत आहेत.त्यामुळे नेहमी प्रमाणे जरा कुठे पाऊस वारा आला की,कायमच येथील बत्ती गुल होत असते.त्यात करुन लाईटबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर कॅाल लागत नाही.हे तर रोजचेच प्रकार घडत आहेत.मात्र विद्युत बिले भरमसाठ वाढत आहेत. एखाद्या वेळी अशा प्रकारची घटना निदर्शनास आणली की नेहमीप्रमाणे करतो हेच उत्तर असते मात्र वेळ गेली की कोणीही तिथे बघत नाही. असाच काहीसा प्रकार मळेवाड चराटकरवाडी येथे निदर्शनास पडत आहे.येथील विद्युत पोल वरील अनावश्यक तारा ह्या जमिनीवर लोंबकळत असून ह्या पोलवर अगदी हाताला मिळतील अशा फ्युज असून ह्या तुटलेल्या स्थितीत असून त्याला काठीचा आधार देण्यात आला आहे.सद्या पावसाचे दिवस असून या पोलच्या बाजूला येथील शेतकऱ्यांची शेती असून येथून पुराचे पाणी वाहत असते.त्याचप्रमाणे येथे घरे असल्याकारणाने येथील लहान लहान मुले शेतकरी ग्रामस्थ यांची सतत ये जा असते.मात्र ऐवढ असतानाही ह्या पोलवरील तारा तुटलेल्या काठीचा आधार दिलेल्या फ्युज बदलायला या विभागाकडे वेळच नाही.म्हणजे एखादी मोठी दुर्घटना घडली किंवा निवेदन दिली तरच ही कामे होणार काय ? असा सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.त्यामुळे लवकरात लवकर याबाबत योग्य ती कारवाई करुन पुढील होणारा अनर्थ टाळावा ही मागणी होत आहे.