कायदेशीर लढाई जारी ठेवणार : के. कविता
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगातून बाहेर पडल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी बीआरएस नेत्या के. कविता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी न्याय होईल असे माझे मानणे आहे. मी माझी कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार असल्याचे कविता यांनी हैदराबादकरता रवाना होण्यापूर्वी म्हटले आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या असलेल्या कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यावर मंगळवारी संध्याकाळी तिहार तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते.
कविता या 5 महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत न्यायालयीन कोठडीत होत्या. तुरुंगातून बाहेर पडल्यावर कविता यांनी दिल्लीतील बीआरएस पक्ष कार्यालयात जात स्वत:चा मुलगा आणि बंधू केटीआर यांची भेट घेतली. जामिनाची अट म्हणून कविता यांना स्वत:चा पासपोर्ट जमा करावा लागला आहे. दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी कविता यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आप नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक करण्यात आली होती. यातील मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे सध्या जामिनावर बाहेर पडले आहेत. तर केजरीवाल अद्याप तिहार तुरुंगात कैद आहेत.