रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करून रुंदीकरण करा
येळ्ळूर ग्रामपंचायतचे पालकमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : येळळूर गावच्या मुख्य रस्त्याचे गेल्या दहा वर्षापासून डांबरीकरण करण्यात आले नसल्याने रस्ता खराब झाला आहे. तर रहदारी वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यासाठी सदर रस्त्याचे डांबरीकरण करून रुंदीकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायततर्फे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले. येळ्ळूर येथील गणेश मंदिरपासून ते गावाच्या शेवटच्या हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे.स्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. गेल्या दहा वर्षापासून रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने रस्ता ठिकठिकाणी खराब होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक जणांना अपंगत्वही आले आहे. याची त्वरित दखल घेण्याची मागणी ग्रा. पं. सदस्यांकडून करण्यात आली. या रस्त्यावरून सुळगे येळ्ळूर, राजहंसगड, नंदीहळळी, देसूर, गर्लगुंजी याबरोबरच खानापूर तालुक्याला जाणाऱ्या वाहनांची रहदारी कायम असते. रस्त्यावरून अवजड वाहनांचीही कायम वर्दळ असते. त्यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत. रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. यासाठी रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी येळ्ळूर ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक पाटील, माजी अध्यक्ष सतिश पाटील, सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशुराम परीट, ज्योतिबा चौगुले, मनीषा घाडी, सोनाली यळ्ळूरकर, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.