Kolhapur News : महाराष्ट्रातील 200 साखर कारखाने का जोडले जाऊ शकत नाहीत ? : माजी खासदार राजू शेट्टी
एआय शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर करा : राजू शेट्टी
कोल्हापूर : कारखान्याच्या फायद्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर नको. शेतकऱ्यांचे हित ही या तंत्रज्ञानामध्ये जपा. या तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस उत्पादनामध्ये वाढ होईल. तर ती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. पण त्याचबरोबर कारखानदाराचाही फायदा होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे सर्व वजन काटे ऑनलाईन करा. देशातील लाखो पेट्रोल पंप ऑनलाईनने जोडले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रातील २०० साखर कारखाने का जोडले जाऊ शकत नाहीत. असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
माणगाव येथे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेच्या निमंत्रण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुनील पाटील होते. प्रास्ताविक प्रा. दीपक पाटील यांनी करून तालुक्यात हत्ती, गवा आणि रानडुकरांचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. नदी किनारी रानडुकरांचे कळप आहेत. हुमणीसाठी ते ऊस पिकांचे नुकसान करत आहेत. त्याचा वेळीच बंदोबस्त वनखात्याने करावा.
शेट्टी पुढे म्हणाले, शुगर कंट्रोल अॅक्ट १९९६ हा शेतकऱ्यांच्या बाजूने असला तरी २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाने अधिकार नसताना यामध्ये बदल केला. त्यासाठी मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. अनेक दिवस केस बोर्डावरती येत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात केस जलद गतीने चालली. जवळजवळ ५० तास यावरती कोर्टासमोर युक्तीवाद चालला आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला.
या विरोधामध्ये सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. एफआरपीचे तुकडे करण्यामध्ये सर्व कारखानदारांचे एकमत आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे. आपणही शेतकऱ्यांची एकजूट दाखवली पाहिजेत. अन्यथा एफआरपीचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहीत. शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी १६ ऑक्टोबरच्या २४ व्या ऊस परिषदेमध्ये जयसिंगपूर येथे येण्याचे निमंत्रण शेट्टी यांनी यावेळी दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एफआरपीची लढाई तर आम्ही लढलोच
पण चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातील कारखानदारांनी २०२२-२३ चे ५० रुपये देण्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले आहे. ते आम्ही बसूल करूच. तसेच पूरग्रस्तांसाठी सरकारने जर प्रति टन १५ रुपये कपातीचे धोरण अवलंबले तर आम्ही त्याला विरोध करू. मुळात आपली शेती परवडणारी नाही. मग आमच्याच ताटातील तुम्ही का काढून घेता, असा सवाल राजेंद्र गड्यांण्णावर यांनी केला.
यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, बाळाराम फडके, जानबा चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तानाजी गडकरी, उपसरपंच बाबुराव फडके, सरपंच प्रकाश बाईंगडे, मारुती अर्जुनवाडकर, के. टी. पाटील, कृष्णा रेगडे, पिंटू, गुरव, सातू रामगावडे, लक्ष्मण मेणसे, पांडुरंग बेनके, सतीश सबनीस वीरुपश्न कुंभार, विश्वनाथ पाटील उपस्थित होते. आभार गोपाळ गावडे यांनी मानले.