रायबरेली, अमेठीत उमेदवार कोण?
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा टप्पाही पूर्ण झाला आहे. 7 मे या दिवशी तिसरा टप्पा आहे. तथापि, उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोन ‘अतिमहत्वाच्या“ मतदारसंघांमध्ये अद्यापही काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केलेली नाही. साऱ्यांना याचे आश्चर्य वाटत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत तरी नावांची घोषणा झालेली नव्हती. हे गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ मानले जातात. तेथे अनुक्रमे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी निवडणूक लढवितील असे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. पण घोषणा झालेली नाही.
या दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांच्यासंबंधी काँग्रेस कार्यकर्ते बऱ्याच अपेक्षा बाळगून आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी येथे येतील आणि सर्वांना हरवितील. उत्तर प्रदेशात सध्या काँग्रेसची हवा आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये पक्ष विजयी होईल, असे कार्यकर्ते सांगतात.
20 मे ला मतदान
मतदानाच्या पाचव्या टप्प्यात 20 मे या दिवशी या दोन मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम वेळ आता जवळ आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत केले होते. मात्र, केरळच्या वायनाड येथून गांधी निवडून आले होते. यावेळी त्यांनी केवळ वायनाडमध्येच उमेदवारी सादर केली होती. तेथे मतदान पार पडले आहे. आता अमेठी आणि रायबरेलीत काय होणार याची उत्सुकता आहे.