Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू
मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य पाचजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.
यामध्ये अजित पवार यांच्या संदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे मात्र, या धावपळीच्या दरम्यान अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल नेमका कुणाला गेला होता, याची माहिती आता समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना झाला होता. विमानात बसण्यापूर्वी दोघांमध्ये चर्चा झाली होती. “मी नंतर फोन करतो,” असे सांगत अजित पवार यांनी फोन ठेवला. हाच फोन त्यांचा शेवटचा ठरला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आत्या असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये नाते आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राणाजगजीतसिंह पाटील कुटुंबासह तात्काळ बारामतीकडे रवाना झाले.
अपघात कसा झाला?
विमानाच्या लँडिंग वेळी हा अपघात झालेला आहे. या अपघाताचे धक्कादायक व्हिडिओही आता समोर येत आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे.विमान कोसळल्यानंतर विमान जळाल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण
“राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत तीन दिवसाचा दिखवटा जाहीर करण्यात आला आहे. कधीही भरून न निघणारं असं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण आहे. अजितदादा गेले यावर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही” असं मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवार हे जनतेच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असायचे. लोकांमध्ये त्यांचा वावर असायचा.