For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास थांबणार कधी?

11:18 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास थांबणार कधी
Advertisement

नागरिकांतून संतप्त सवाल  : परिवहन विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज

Advertisement

बेळगाव : शहरात उपनगरे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. लहानांपासून ते किशोरवयीन विद्यार्थी विविध भागातून शहरात येत असतात. मात्र अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला तेंड द्यावे लागत आहे. ही समस्या नित्याचीच बनल्याने विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसेसच्या पायऱ्यांवर थांबून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यामुळे मुलांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर येत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे परिवहन मंडळाने बसफेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे.  तसेच हा धोकादायक प्रवास थांबणार तरी कधी? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळी व सायंकाळी शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत बसस्थानकांवर प्रचंड गर्दी उसळते. अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे अनेक मार्गांवर बसमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी प्रवास करतात. परिणामी विद्यार्थ्यांना बसच्या दरवाज्यात, पायऱ्यांवर किंवा अर्धवट लटकून प्रवास करावा लागत आहे. विशेषत: ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था अधिक बिकट आहे. वेळेवर बस न मिळाल्याने उशीर होऊ नये म्हणून विद्यार्थी जीव धोक्मयात घालून बसमध्ये चढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांनी आणि विविध संघटनांनी शालेय व महाविद्यालयीन वेळेत अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यासाठी आंदोलने केली असली तरी याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गर्दीच्या मार्गांवर जादा बसेस सोडण्याची तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र किंवा विशेष बससेवा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यासोबतच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या बसेसवर निर्बंध घालण्याची मागणीही होत आहे. बसफेऱ्या वाढवून, वेळापत्रकात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अपघात झाल्यानंतरच परिवहन मंडळाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :

.