For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भटक्या कुत्र्यांचे हल्ले थांबणार कधी?

10:45 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भटक्या कुत्र्यांचे हल्ले थांबणार कधी
Advertisement

बालके टार्गेट, रेबिजचा धोका, प्रशासन सुस्त, नागरिक संतप्त

Advertisement

बेळगाव : मागील आठवड्यात भटक्या कुत्र्यांनी 14 जणांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शनिवारी 14 जणांवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले शहरवासियांना चिंताजनक ठरू लागले आहेत. शिवाय भटक्या कुत्र्यांचे हल्ले थांबणार कधी? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांनी एका आठवड्यात 28 जणांचा चावा घेतला आहे. तर  यामध्ये बालकांचा समावेश अधिक आहे. एका तरुणाचा रेबिजमुळे जीव गेला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान बालके टार्गेट होत असल्याचेही समोर येऊ लागले आहे. शिवाय या हल्ल्यामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, मनपा आणि पशुसंगोपन खातेही सुस्त असल्याचे दिसत आहे. अलीकडे बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जिल्ह्यात 77 हजार पाळीव कुत्र्यांची संख्या आहे. तर एका बेळगाव शहरात अंदाजे 30 हजार भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. यामध्ये दरवर्षी भर पडू लागली आहे. यातूनच रेबिजसारख्या संसर्गजन्य रोगाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे मानव आणि जनावरांना रेबिजचा धोका वाढू लागला आहे. किणये येथील एका युवकाचा रेबिज झालेल्या कुत्र्याच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाल्याची घटना घटना घडली आहे. त्यामुळे रेबिज रोगाबाबत जनमाणसांत भीती निर्माण झाली आहे.

अँटीरेबिज लसीकरणाकडे दुर्लक्ष

Advertisement

पशूसंगोपन खात्यामार्फत दरवर्षी अँटीरेबिज पंधरवडा साजरा करून सर्व कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लसीकरण केले जाते. मात्र, काही श्वान पालकाकडूनच याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कुत्री प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहतात. दरम्यान रेबिजसारख्या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारी म्हणून श्वान पालकांनी सर्व कुत्र्यांना लस घेणे गरजेचे आहे.

भटक्या कुत्र्यांना आवरणार कोण?

शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा कुत्र्यांना आवरणार कोण? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. मनपा केवळ तात्पुरती नसबंदी किंवा पकड मोहीम राबविते. मात्र त्यानंतर कुत्र्यांचे कळप शहरात कायम दिसत असतात. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी पुढाकार कोण घेणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शहरातील बस स्थानक, सदाशिवनगर, उज्ज्वलनगर, महांतेशनगर,  समादेवी गल्ली, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी कुत्र्यांचे कळप वाढले आहेत. आणि अशा भटक्या कुत्र्यांकडूनच बालकांवर हल्ले होऊ लागले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले शहरवासियांसाठी चिंताजनक बाब बनू लागली आहे.

भटकी कुत्री लसीकरणापासून वंचित

सर्व कुत्र्यांना पशुसंगोपन खात्यामार्फत मोफत प्रतिबंधक लस दिली जाते. मात्र, भटकी कुत्री या लसीकरणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे रेबिजचा धोका  होऊ शकतो. मनपाने भटक्या कुत्र्यांना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

- डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)

Advertisement
Tags :

.