पाकिस्तानचे तीनतेरा कधी होणार ?
दहा दिवसांपूर्वी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकांचा एव्हढा सपाटा लावला की पाकिस्तानबरोबर दोन हात लवकरच होणार अशी वातावरण निर्मिती झालेली आहे. ‘चुन चुन के मारेंगे’ असे सत्ताधारी सांगत आहेत. जगाला भारताचा उद्वेग आणि उद्देश कळावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटण्यातील रॅलीमध्ये थोडे भाषण इंग्लिशमध्ये केले. पण कृती कधी होणार? याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
लष्कराला कोणतीही कारवाई करण्याचे सर्वाधिकार दिले गेलेले आहेत असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात जमिनीवर फारसे काही घडताना दिसत नाही आहे. चढाईकरता देशाला कोणती वेळ सोयीची अथवा कसे? याबाबत यंत्रणा चालली आहे की काय हे काळच सांगेल. तात्पर्य काय तर आता कोणत्याही लुटुपुटीच्या लढाईवर देशवासीयांचे समाधान होणार नाही असेच दिसू लागले आहे. इशारे आणि हातवारे यांची वेळ आता टळून गेलेली आहे. मोदी सरकारने जातीय जनगणनेला अचानक हिरवा कंदील गेल्या आठवड्यात दाखवला तेव्हा पंतप्रधानांच्या काही समर्थकांनी अचंभाव व्यक्त केला. ‘आम्ही पाकिस्तानला धडा शिकवण्याची वाट पहात होतो आणि पंतप्रधानांनी हे काय बरे केले’ असे उदगार समाजमाध्यमावर दिसून आले. ‘सरकारकडून खोट्या अपेक्षा ठेवू नका. हे मूर्खांचे सरकार आहे. पाकिस्तानचे वाटोळे करायला निघालेल्या या सरकारने आता हिंदुस्तानचेच वाटोळे करायचे ठरवलेले दिसत आहे’, अशी जळजळीत प्रतिक्रिया एका उच्चवर्णीयाने दिली. भाजप असे काही करेल हे त्याच्या स्वप्नातही नव्हते. पक्षात असा बराच वर्ग आहे. हा निर्णय म्हणजे लोकांचे ध्यान दुसरीकडे गुंतवणे आहे असा देखील काहींचा दावा आहे. सत्य प्रत्यक्षात काय आहे ते येणारा काळ दाखवेल.
गमतीची गोष्ट म्हणजे जातीय जन गणनेला दिला गेलेला हा हिरवा कंदील म्हणजे विरोधकांचा विजय आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातील भाजपचे हिंदुत्वाचे मजबूत कवच फोडण्यात विरोधक यशस्वी झाले होते. या मुद्यावर राहुल गांधी यांनी रान उठवले होते आणि अजूनही उठवत आहेत हे राजकारणाशी अनभिज्ञ असलेल्यांना देखील कळलेले आहे. त्या निवडणुकीतील उत्तरप्रदेशातील भाजपचे पानिपत हे पक्षाला धक्का देणारे ठरले. भाजपला केवळ बिहारची निवडणूक जिंकायची आहे, असे काही म्हणू लागले आहेत. एका न्यूज चॅनेलवरील महिला अँकरला तर या निर्णयानंतर लाईव्ह टीव्हीवर म्हणे अक्षरश: रडू कोसळले. जेव्हा विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता तेव्हा पंतप्रधानांसह सर्वच भाजप नेत्यांनी त्यांना धु धु धुतले होते. विरोधक म्हणजे ‘अर्बन नक्सल’ आहेत असे म्हटले होते. ‘सत्ताधारी समर्थकांतील हा उद्वेग त्याचेच पर्यवसान होय.’ महाभारतातील अर्जुनाप्रमाणे मोदी सरकारला केवळ ‘माशाचा डोळा’ (पाकिस्तान) च दिसले पाहिजे असा त्याचा आग्रह आहे. तो किती बरोबर अथवा चूक हे काळ दाखवेल. जन गणनेबाबतच्या भाजपच्या या अचानक निर्णयामागे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दबाव दिसून येत आहे. पहलगामच्या पार्श्वभूमीवर बिहारची येती निवडणूक सोपी राहिलेली नाही याची ती निशाणी होय. प्रशांत किशोर यांच्यासारखे नव्याने उदयाला आलेले नेते तर नितीश हेच भाजपच्या गळ्यातील धोंड आहेत असे प्रतिपादन करत आहेत. निवडणूकपूर्व चाचण्यात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव नेता म्हणून बाजी मारत आहेत.
जेव्हा 1989-90 मध्ये व्ही पी सिंग यांचे सरकार देवीलाल यांच्या बंडाने अल्पमतात येण्याचा धोका उत्पन्न झाला तेव्हा सिंग यांनी मंडळ आयोगाचे अस्त्र अचानक बाहेर काढून विरोधकांना चीत करण्याचा प्रयत्न केला होता. आता ‘आरपार’ ची लढाई करून पाकिस्तानची चार शकले करा असा सल्ला काही निवृत्त सैन्याधिकारी आणि सरकारधार्जिणे मुत्सद्दी मंडळी देत आहेत. ‘हीच ती घटिका आणि हीच ती वेळ’ असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. आज इतका पाकिस्तान कधीच कमजोर नव्हता याबाबत सर्वच संरक्षण तज्ञांचे एकमत आहे. एकीकडून बलुचिस्तानमधील स्वतंत्रतावादी आणि दुसरीकडून अफगाणिस्तानातून आलेले स्थानिक तालिबानी पाकिस्तानला दिवसरात्र सतावत आहेत आणि पाकिस्तान खरेच जेरीला आलेला आहे. पाकिस्तानी लष्करानं म्हणूनच काश्मीर कार्ड खेळलेले आहे. भारतविरोधी भूमिका घेऊन लोकांना संघटित करण्याची इस्लामाबादची ही टूम आहे. इस्लामाबादचा लष्कर प्रमुख असीम मुनीर पाकिस्तानी लष्करातील पहिला ‘मुल्ला जनरल’ मानला जातो. त्याला केवळ कुराण मुखोदगत आहे एव्हढेच नव्हे तर पाकिस्तानमधील जिहादप्रवृत्तीला खतपाणी घालण्यासाठी तो त्याचा पुरेपूर वापर करतो. इस्लामिक जगताला पाकिस्तानच्या मागे उभे करण्यासाठी त्याचे नेहमी प्रयत्न चाललेले असतात. इम्रान खानला तुरुंगात टाकल्यानंतर तेथील लष्कर कधी नव्हे एव्हढे लोकात अप्रिय झालेले आहे. पारंपरिक युद्धात आपला भारतापुढे निभाव लागणार नाही हे माहित असल्यानेच पाकिस्तान भारताला नेहमी अणवस्त्र वापरण्याची धमकी देत असतो. त्याने असे काही वेडे कृत्य केले तर तो जगाच्या पाठीवरून नाहीसा होईल.
भारतीय युद्ध जाणकारांपैकी काहीजण पाकिस्तानशी प्रत्यक्ष युद्ध छेडले गेले तर त्यात धोकाच आहे असे ठासून सांगतात. युक्रेनला चुटकीसरशी धडा शिकवण्याचे ठरवून रशिया आत घुसला खरा पण एव्हढा बलाढ्या देश असूनही तो गेली तीन वर्षे तिथे अडकून पडलेला आहे याची ते जाणीव करून देत आहेत. मर्यादित युद्ध हे पूर्ण संकल्पनाच चुकीची आहे असे ते मानतात. एकदा का आग पेटली की ती कशी वाढत जाईल ते सांगता येत नसते तसेच युद्धाचे असते.
गमतीची गोष्ट म्हणजे पहलगाम हल्ला आणि त्यानंतरचे राजकारण हा भारत आणि पाकिस्तान या उभयतांचा प्रश्न आहे असे सांगत अमेरिका हा पाकिस्तानची कानउघाडणी करत नाही आहे. अमेरिकन वर्तमानपत्रातून हा सारा विषयच जणू गायब आहे. तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. चीन हा अलीकडील काळात पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र झालेला आहे. या शनी-मंगळाच्या युतीपासून भारताने सावधान राहायला हवे. आता अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेट यांनी या मुश्किल घडीत अमेरिका भारताबरोबर उभा आहे आणि भारताला आपले संरक्षण करण्याचा अधिकार आहे असे सांगत थोडे सावरून घेतलेले आहे. रशियाने या मुद्यावर अजून ब्र काढलेला नाही. यावेळेला पाकबरोबर दोन हात झाले तर भारताला प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे साडेतीन आघाड्यांवर लढावे लागेल असे काहीजण सांगतात. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश हे ते तीन शत्रू आहेत आणि देशांतर्गत लपलेले दहशतवादी हा अर्धा शत्रू होय. 2019 साली वादग्रस्त 370 कलम हटवल्यापासून जम्मू आणि काश्मीरमधील सामान्य जनतेशी केंद्राने अथवा स्थानिक प्रशासनाने कोणत्याच प्रकारे संवाद केला नसल्याने तेथील जनता उदासीन बनलेली आहे.
उद्भवलेल्या परिस्थितीत विरोधी पक्षांनी सरकारच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घोषित करून एक प्रकारे पंतप्रधानांना सर्वाधिकार दिलेले आहेत. आता केंद्राला पुढील पावले उचलावयाची आहेत. अशावेळी दहशतवादाच्या या गंभीर प्रश्नावर संसदेचे एक विशेष अधिवेशन सत्वर बोलवावे या विरोधकांच्या मागणीने सरकार अडचणीत आल्यासारखे दिसतेय. कोणाच्या हलगर्जीपणाने पहलगामचा हल्ला झाला? असे एकानेक प्रश्न त्यात विचारले जाऊ शकतात. थोडक्यात काय तर पंतप्रधान बनल्यापासून मोदी यांची सर्वात कसोटीची घडी या हल्ल्यानंतर आली आहे.
सुनील गाताडे