कारण काहीही असो... जीव देणे हा पर्याय नसतो...
सांगली / विनायक जाधव :
जिल्हयात गेल्या काही दिवसापासून आत्महत्येचे सत्र थांबले होते. पण आता हे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. यामध्ये उच्चशिक्षीत असणारे आणि चांगली नोकरी असणारेही आत्महत्या करू लागले आहेत. जत पंचायत समितीकडे असणाऱ्या अभियंत्याने कृष्णेत उडी मारून आत्महत्या केली. वरिष्ठाच्या जाचाला आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले. त्याबरोबरच प्रेमभंग आणि नैराश्यानेही आत्महत्या झाल्या आहेत. तसेच कौटुंबिक वादातूनही आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या कशा रोखायचा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आत्महत्या करणारा करून जातो, पण त्याचा वाईट परिणाम त्याच्या कुंटुंबावर किती होतो याचा कोणताही विचार होताना दिसत नाही.
सध्याचे जग हे सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांशी क्षणात संपर्कात येत आहे. इतके सहज जीवन झाले असतानाही लोक आत्महत्या का करत आहेत. याचा विचार आता पुन्हा एकदा करण्याची गरज निर्माण झाली आहे. मनुष्य जन्म हा नशीबाने मिळतो असे म्हंटले जाते. पण हा नशिबाने मिळालेला हा मनुष्य जन्म मात्र अनेकजण आपल्या स्वतःच्या हातानेच संपवत चालले आहेत. समाजात वाढणाऱ्या आत्महत्या या चिंताजनक बनत चालल्या आहेत. हा एक सामाजिक प्रश्नच निर्माण झाला आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातच आता तर आत्महत्या करताना ती सोशल मिडियाच्या माध्यामातून लाईव्ह करून केली जात आहे. मृत्यूचा स्टेटस ठेवून आत्महत्या करण्यात येत आहेत. जिल्हयात गेल्या वर्षभरात ६०० पेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
म्हणजेच जिल्ह्यात दिवसाला सरासरी दोन व्यक्ती आत्महत्या करत आहेत. या प्रश्नाचे उत्तर कशात आणि कोणाकडे शोधायचे हा ज्वलंत प्रश्न आहे.
काही महिन्यापुर्वी मिरज तालुक्यात सोनी येथे मुलगी पसंत नसल्याच्या कारणावरून कुंटुंबांत वाद झाले आणि या वादाचे रूपांतर आत्महत्येत झाले. पहिल्यांदा बापाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली तर त्याचा मृतदेह पाहून मुलाने आत्महत्या केली. एकाच घरातील दोन कर्ते पुरूषांचा तात्काळ मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण कुंटंबच उध्दवस्त झाले आहे. त्याचीच पुनरावृत्ती कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे झाली. येथील एकाच कुंटुंबातील चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यात दोन महिलांचा तात्काळ मृत्यू झाला. दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार केल्याने ते दोघे वाचले. पण सासू-सुनेचा मृत्यू झाला. अशा घटना रोखायच्या कशा हा प्रश्न भेडसावत आहे.
- कौटुंबिक वादच आत्महत्येला कारण
जिल्हयात आत्महत्या घडत चालल्या आहेत. त्यामधील सर्वाधिक आत्महत्या या कौटुंबिक कारणातून झालेल्या आहेत. कौटुंबिक कारणातून आणि कलहातून ४०० पेक्षा अधिक आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये सरासरी ३०० पेक्षा अधिक पुरुष आहेत तर १०० स्त्रियांचा समावेश आहे. अनेकांना एकटेपणाची जाणीव होत आहे. त्यातून वाढणारे नैराश्य हे आत्महत्येकडे उचलले जाणारे पहिले पाऊल ठरत आहे. नवीन पिढीने तर आपल्या घरातील मंडळीशी सातत्याने संवाद ठेवला पाहिजे. त्याचवेळी या आत्महत्या निश्चितच कमी होतील. ब्रेकअप होणे, परिक्षेत कमी मार्क पडणे, कर्जबाजारी होणे अशा अनेक गोष्टी या आत्महत्येला कारणीभूत आहेत. याशिवाय संशय हा महत्वाचा विषय आहे. अनेकजण आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहेत. या घडणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने नैराश्यात गेलेल्या व्यक्तीशी बोलणे झाले पाहिजे तरच बदल घडू शकतो. अन्यथा अशा घटना थांबवणे अवघड बाब बनू शकते.
याचाच अर्थ ८० टक्के पुरुषांनी आणि फक्त २० टक्के महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. महिला या कितीही संकट येवू दे त्या संकटाला धीराने तोंड देतात. पण पुरूष मात्र या संकटाला घाबरून आत्महत्या करतात. ही गोष्ट शेतकरी आत्महत्यांच्या अहवालातून प्रकर्षाने पुढे आली आहे. कोणत्याही संकटाला स्त्री जितक्या सक्षमपणे तोंड देवू शकते तितक्या सक्षमपणे पुरुष तोंड देवू शकत नाही असा अर्थ होतो. स्त्रियांचे आत्महत्येचे प्रमाण कमी आहे हे चांगले आहे.
- या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची गरज
सध्याचे जग हे स्पर्धेचे जग झाले आहे. यामध्ये सर्वांना एकमेकांच्या पुढे जायचे आहे. यामध्ये कोणाच्याही भावनेचा विचार केला जात नाही. त्यामुळे जो आडवा येत आहे. त्याला तोडून, मोडून त्याच्या छातीवर बसून लोक पुढे जात आहेत. यामध्ये अनेक भावनाशील लोकांचे मात्र हाल होत चालले आहेत. या लोकांना अशा लोकांशी कसे वागायचे हेच समजत नाही. यामुळे ते आता अडचणीत येत आहेत. त्यातून त्यांना नैराश्याने ग्रासले गेले की त्यांच्याकडून हे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यासाठी आपल्या जवळचे मित्र आपल्या कुंटुंबातील मंडळी यांनी त्या व्यक्तीला समजून घेतले पाहिजे तरच या गोष्टी टाळता येवू शकतात. लोक नैराश्यात कशामुळे गेले याची माहितीच कोणाला नसते त्यामुळे ही व्यक्ती आत्महत्येपर्यंत कसे पोहोचते हेच समजून येत नाही. नैराश्यात गेल्या व्यकतीचे व्यक्तीमत्व लगेच समजून येते त्याच्या हालचाली त्याचे बोलणे त्याचे घरच्यांशी वागणे यामध्ये तात्काळ बदल होतो. याचवेळी त्याच्या पाठीवर हात ठेवणारी व्यक्ती आणि मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारी व्यक्ती भेटली की त्या व्यक्तीच्या मनातील आत्महत्येचा विचार निश्चितपणे जावू शकतो.