Ravindra Chavan यांच्या नियुक्तीमागील गणितं अन् आव्हानं नेमकी काय आहेत?
भाजप राज्यात ताकदवान करण्याचे उद्दिष्ट चव्हाण यांच्यापुढे असेल
By : संतोष पाटील
कोल्हापूर : भाजपच्या धोरणाप्रमाणेच ठोस कृती कार्यक्रम आखण्यात रवींद्र चव्हाण मातब्बर मानले जातात. महायुतीतील मित्र पक्षाचे शिलेदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शहकाटशहचे राजकारण करुन शतप्रतिशत भाजप हा अजेंडा सत्यात उतरवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.
देवेंद्र फडणवीस हे प्रशासकीय कमान सांभाळत पक्षाची राजकीय कमानही आपल्या हातात ठेवून आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने त्यांना खमक्या पॉलिटिकल हँड मिळाला. महायुती म्हणून राजकारण करत असतानाच भाजप राज्यात ताकदवान करण्याचे उद्दिष्ट चव्हाण यांच्यापुढे असेल.
सामान्य कार्यकर्त्यापासून प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचलेले 56 वर्षीय रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा भाजपच्या मूलभूत तत्त्वांचे प्रतीक आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून 2009 पासून 2024 पर्यंत सलग चारवेळा आमदार म्हणून निवडून येणारे चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
2002 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्षपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 2005 मध्ये कल्याण- डोंबिवली महापालिकेत नगरसेवक, 2007 मध्ये स्थायी समिती सभापती,2016-19 च्या फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अशा विविध भूमिकांपर्यंत पोहोचला.
2020 मध्ये चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. चव्हाण यांचे नेतृत्व संघटन कौशल्य, जनसंपर्क, आणि रणनीतीसाठी ओळखले जाते. चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी मानले जातात.
फडणवीस यांनी स्वत: चव्हाण यांच्या नियुक्तीचे स्वागत करत त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यापासूनच्या प्रवासाचे कौतुक केले आहे. ही नियुक्ती फडणवीस यांच्या पक्ष आणि सरकारवरील पकडीचे प्रतीक आहे. चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे फडणवीस यांचे महायुतीतील आणि पक्षांतर्गत नेतृत्व अधिक बळकट होईल, अशी चर्चा आहे.
महायुतीतील छुपा संघर्ष
भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जागावाटप, नेतृत्व, आणि प्रभावक्षेत्र यावरून अंतर्गत तणाव आहे. चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे भाजपने आपली आक्रमक रणनीती स्पष्ट केली आहे. 2029 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत स्वबळावर शतप्रतिशत यश मिळवणे यासाठी चव्हाण यांचे संघटन कौशल्य आणि स्थानिक पातळीवरील पकड महत्त्वाची ठरेल.
भाजपमधील अंतरंग आणि आव्हान
1 अंतर्गत गटबाजी : चव्हाण यांची नियुक्ती फडणवीस गटाला बळकटी देणारी आहे. मात्र, यामुळे पक्षातील इतर गट, विशेषत: सुधीर मुनगंटीवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चा असून, यामुळे पक्षांतर्गत नेतृत्वाचा समतोल राखण्याचे आव्हान चव्हाण यांच्यासमोर असेल. मागील 10 वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्यापासून दुरावलेले केंद्रस्थ नेतृत्वाच्या साथीने उचल खाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
2 महायुतीतील तणाव : महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी जागावाटपावरून मतभेद आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारी यावरून संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. चव्हाण यांना मित्रपक्षांशी समन्वय साधताना स्वत:च्या पक्षाचे हित सांभाळावे लागेल.
3 महाविकास आघाडीचे आव्हान : महाविकास आघाडी तूर्त कमकुवत वाटत असली तरी शिवसेना आणि मनसे यांच्या मनोमिलनाचा प्रभाव मुंबई-नाशिक, पुण्यासह इतर शहरातील महापालिकेवर होऊ शकतो. खासदार राहुल गांधी यांनी मतदारसंख्येतील वाढीवर प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेवरच आक्षेप घेतले आहेत. चव्हाण यांना या आघाडीच्या आक्रमक रणनीतीला तोंड द्यावे लागेल.
4 शतप्रतिशतचा अजेंडा : भाजपचा 2029 पर्यंत स्वबळावर शतप्रतिशत यश मिळवण्याचा अजेंडा अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. यासाठी पक्षाला ग्रामीण आणि शहरी भागात आपली पकड मजबूत करावी लागेल. चव्हाण यांचे डोंबिवलीतील यश हे शहरी भागातील त्यांच्या प्रभावाचे द्योतक आहे. परंतु ग्रामीण भागातही तितकाच प्रभाव निर्माण करणे हे त्यांच्यासमोर आव्हान असेल.