पाणीपुरवठा, शिक्षण क्षेत्रासाठी भाजपचे योगदान काय?
मंत्री सतीश जारकीहोळी : कुडची येथे कार्यकर्त्यांचा मेळावा
बेळगाव : भाजपकडून विकासाचे राजकारण केले जात नाही. त्यांच्याकडून केवळ खोटी आश्वासने दिली जात आहेत. पाणीपुरवठा योजना, शिक्षण क्षेत्रामध्ये भाजपचे योगदान काय आहे? याबाबत मतदारांनी प्रश्न उपस्थित करावा, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. कुडची येथे काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा प्रचार करून कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये मंत्री सतीश जारकीहोळी बोलत होते. भाजपकडून केवळ खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही खोटी आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे खोटी आश्वासने देणाऱ्यांना मतदारांनी घरी पाठविले पाहिजे. यासाठी मतदारांनी जागरुक राहून येत्या निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या अडीअडचणीवेळी मदत करणाऱ्या उमेदवाराची निवड करावी. गेल्या 30 वर्षांपासून बेळगाव जिल्ह्यासह चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीमध्ये प्रामाणिकपणे सेवा केली जात आहे.
यासाठी काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रियांका जारकीहोळी गेल्या काही वर्षांपासून मिळून मिसळून समाजकार्य करत आहेत. त्यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघातून विजयी केल्यास या भागातील समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल. आपण केव्हाही दिलेले वचन विसरणार नाही, असेही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार शाम घाटगे म्हणाले, कुडची शहरातील नागरिकांनी काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना सर्वाधिक मतदान करून विजयी करावे. निवडणुकीनंतर या भागातील रस्ते, मूलभूत सुविधा याबाबत मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून विकासकामे केली जातील, असे सांगितले. यावेळी 20 पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस नेते विनोद मगदूम, रत्नमजय कद्दु, जयवीर हुंशनमोरे, प्रेमकुमार बालोजी, कुमार गुंडाळे, लक्ष्मण तेली, चिदानंद मोदी, नामदेव निकम, संजीव गस्ती, श्रीमंत नायक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.