दक्षिणेत नेमके काय होणार ?
07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
- दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश ही तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अद्याप स्वबळावर लोकसभा निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. या निवडणुकीत मात्र या पक्षाने या तीन राज्यांमध्ये जीव तोडून प्रयत्न चालविलेले दिसतात. या प्रयत्नांची पार्श्वभूमी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच तयार करण्यास प्रारंभ करण्यात आला होता.
- विविध मतदानपूर्व सर्वेक्षणांचा आढावा घेतला असता, सहा सर्वेक्षणांपैकी चार सर्वेक्षणांमध्ये तामिळनाडूत भारतीय जनता पक्षाला 3 ते 4, केरळमध्ये 1 ते 3 तर आंध्र प्रदेशमध्ये 2 ते 4 जागांवर संधी आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आंध्र प्रदेशात या पक्षाची तेलगु देशमशी युती असून पक्ष 6 जागा लढवित आहे. तामिळनाडूत पीएमके तर केरळमध्येही एका स्थानिक पक्षाशी युती आहे.
- मतदानपूर्व सर्वेक्षणांचे प्रसारण बंद होण्यापूर्वी जे अंतिम सर्वेक्षण प्रसारित झाले आहे, त्यात भारतीय जनता पक्षाला दक्षिणेतील या तीन राज्यांपैकी केवळ आंध्र प्रदेशमध्ये जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये पक्षाचे खाते याहीवेळी उघडणार नाही, असे वर्तविण्यात आले आहे. ही सर्व सर्वेक्षणे दक्षिणेतील या राज्यांसंदर्भात एकमेकांपासून भिन्न आहेत.
नेमके होणार काय ?
Advertisement
- पूर्वीच्या निवडणुकांची आकडेवारी पाहता तामिळनाडूत भारतीय जनता पक्ष असो, की काँग्रेस, या दोन्ही पक्षांना द्रमुक किंवा अण्णाद्रमुक यांच्यापैकी एकाशी युती केल्याखेरीज जागा मिळत नाहीत हा अनुभव आहे. भारतीय जनता पक्षानेही एकदा अद्रमुकशी तर एकदा द्रमुकशी युती करुन काही जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. पण यावेळी त्याची या दोन पक्षांपैकी एकाशीही युती नाही.
- काँग्रेसने द्रमुकशी युती करुन आठ जागा लढविण्यासाठी मिळविल्या आहेत. मागच्या निवडणुकीतही या पक्षाने त्या राज्यात त्याला मिळालेल्या सर्व आठ जागा जिंकल्या होत्या. यावेळी या पक्षाला अशीच अपेक्षा आहे. पण काही सर्वेक्षणांच्या मते काँग्रेसला काही जागांचा फटका बसू शकतो. मागच्या निवडणुकीत दोन जागा कमी मताधिक्क्याने जिंकल्या होत्या, याकडे लक्ष वेधले गेलेले आहे.
निष्कर्ष : या तीन राज्यांमधील स्थिती भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने स्वारस्यपूर्ण आहे. तामिळनाडूतील या पक्षाचे तरुण आणि कार्यशील नेते के. अण्णामलाई यांनी जीव तोडून पेलेले प्रयत्न आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारात या राज्यावर दिलेला भर कामी येतो, की पुन्हा भारतीय जनता पक्षाची पाटी कोरीच राहते, हे 4 जूनलाच समजणार आहे. आंध्रात युती असल्याने एक दोन जागा या पक्षाच्या पदरात पडू शकतात. केरळमध्ये 1 जागा जरी मिळाली तरी ते मोठे यश मानले जाईल. तथापि, याचा उलगडा मतगणनेनंतरच होणार आहे.
Advertisement
Advertisement