वीस वर्षांत भाजपने कोणती विकासकामे आणली ?
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सवाल : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रचार
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून सत्तेवर असणाऱ्या भाजप खासदारानी मतदारसंघात केंद्र सरकारकडून कोणती विकासकामे आणली आहेत. मतदारसंघातील कोणत्या भागाला भेट दिली आहे. असा सवाल महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार करून त्या बोलत होत्या. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा महिन्यांमध्ये हजार कोटींची विकासकामे राबविण्यात आली आहेत. सातत्याने विकासकामे सुरू आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाकडून मृणाल हेब्बाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या धर्तीवरच बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मृणालला सेवेची संधी द्या
2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण थोडक्या मताच्या अंतराने पराभूत झालो. यावेळी आपला मुलगा मृणाल हेब्बाळकर निवडणुकीच्या मैदानात असून मतदारांकडून भरघोस पाठिंबा मिळत आहे. अशाप्रकारेच भरघोस मतदान करून त्यांना निवडून द्यावे व सेवेची संधी द्यावी असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. काँग्रेस पक्षाकडून नेहमीच वचन पाळण्यात आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारकडून देण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजनांची पूर्तता करण्यात आली आहे. यामुळे समाजातील सर्व वर्गातील नागरिकांना लाभ झाला आहे. असेही त्यांनी सांगितले
समस्यांची चांगली जाणीव
यावेळी मृणाल हेब्बाळकर म्हणाले, या लोकसभा मतदारसंघांमध्ये बाहेरून असलेल्यांना स्थानिक समस्यांची काय जाणीव असणार. तर मग विकासाची काय अपेक्षा ठेवणार. त्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास साधता आला नाही तर या मतदारसंघात काय विकास करणार. गेल्या दहा वर्षापासून आपण मतदारसंघात फिरत आहोत त्यामुळे येथील समस्यांची चांगली जाणीव आहे. भविष्यामध्ये या समस्या सोडवून मतदारसंघाचा संपूर्ण विकास केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदीप एम. जे, परशराम ढगे, वसंत नागोजीचे, दत्ता पवार, प्रभाकर हट्टीकर, आनंद माळगी, मीनाक्षी नलावडे, माधुरी जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.