काँग्रेसकडून गोर-गरिबांचे कल्याण
सर्व नागरिकांच्या विकासाला प्राधान्य : निपाणी येथे प्रचारप्रसंगी प्रियांका जारकीहोळी यांचे आवाहन
बेळगाव : काँग्रेस पक्षाकडून नेहमीच गोर-गरिबांच्या कल्याणासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवून गरिबांचे हीत साधले आहे. पक्षाने शेतकरी, कामगार, श्रमिकांसह तळागाळातील सर्व समाजातील सर्व नागरिकांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला पाठिंबा देवून आपल्याला निवडून द्यावे, असे आवाहन चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. निपाणी विधान सभा मतदार संघातील कारदगा, भोज, जिल्हा पंचायत व्याप्तीतील कार्यकर्त्यांच्या प्रचार मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. काँग्रेस पक्षाने नेहमीच दिलेले वचन पाळले आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात 165 आश्वासने देण्यात आली होती. त्यापैकी 158 आश्वासनांची पूर्तता करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अन्नभाग्य, क्षीरभाग्य, शु-भाग्य, शेतकऱ्यांचे कर्ज माफ, इंदिरा कॅन्टीन याबरोबरच गोर-गरिबांसाठी निवासी योजनांची घोषणा केली होती. त्याची पूर्तता करण्यात आली आहे.
गॅरंटी योजना गोर-गरिबांसाठी वरदान
गेल्या विधानसभा निवडणुकीत पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्या योजनांची समर्पकपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. गॅरंटी योजना गोर-गरिबांसाठी वरदान ठरल्या आहेत. अशा विकासाभिमुख योजना राबवून सर्व स्तरातील नागरिकांना न्याय दिला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गरिबांचे कल्याण साधण्यावर भर दिला आहे. आपले सरकार गोर-गरिबांच्या कल्याणाचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे हीत साधून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणारे सरकार आहे, असे प्रियांका जारकीहोळींनी सांगितले.
महिला सबलीकरणाला प्राधान्य
गॅरंटी योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंब प्रमुख महिलेला प्रतिमहिना दोन हजारांची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे महिला आर्थिकरित्या सबल होण्यास मदत मिळत आहे. तसेच शक्ती योजनेमुळे मोफत बस प्रवासाची सोय करण्यात आली आहे. यामुळे रोजगारासाठी शहराकडे जाणाऱ्या गोर-गरीब महिलांना तसेच शहरांमधील महिलांनाही याची मोठी मदत मिळत आहे. अशा प्रकारे विकासाभिमुख योजना राबवून महिला सबलीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. अन्नभाग्य योजनेतून पाच किलो मोफत तांदळाऐवजी पैसे दिले जात आहेत. अशा कल्याणकारी योजना राबविणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुकीच्या मैदानात असून आपल्याला बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन प्रियांका जारकीहोळी यांनी केले. यावेळी आमदार माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, सचिन केस्ती, लक्ष्मण इंदलकर, डॉ. माने, शंकर पाटील, सुप्रिया पाटील, बसवराज पाटील, राजू व•र, राजेश कदम, पंकज पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.