नियम धाब्यावर बसून नवीन वर्षाचे स्वागत
पोलिसांसह सर्व यंत्रणांचे डोळे, कान, तोंड बंद
पणजी : नवीन वर्ष स्वागताच्या संगीत, नृत्य पार्ट्या सर्व नियम धाब्यावर बसवून पहाटेपर्यंत चालू होत्या आणि त्यात मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होऊनदेखील कोणतीच कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशालाही ठेंगा दाखवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यंदा नवीन वर्षासाठी मौजमजा करणे व नाच-गाण्यांसाठी किनारी भागात अनेक ठिकाणी नृत्यरजनी आखण्यात आल्या होत्या. त्या सर्व रात्री उशिरा सुरू होऊन पहाटेपर्यंत चालल्या. परंतु त्या बंद करण्याचे धाडस मात्र कोणी केले नाही. ध्वनी प्रदूषण झाले आणि काही जणांनी तक्रारी देखील केल्या परंतु पोलीस व इतर यंत्रणांनी त्याची फारशी गंभीरतेने दखल घेतली नाही. यंदा विदेशी पर्यटकांची संख्या कमी प्रमाणात दिसून आली तर देशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात आल्याचे पहावयास मिळाले. कोणत्याही प्रकारचे परवाने न घेता सदर पार्ट्या सुरू असल्याचे निदर्शनास आले असून त्यात पर्यटकांनी बेधुंदपणे नाच, गाणे व मौजमजा केल्याचे सांगण्यात आले. अनेक पर्यटक पहाटेपर्यंत किनाऱ्यावर लोळत पडल्याचे दिसून आले तर अनेकजण मद्य उघड्यावर प्राशन करीत असल्याचे आढळून आले. समुद्रकिनारी व इतर ठिकाणी रंगलेल्या या पार्टीत एका टेबलसाठी रु. 8000 ते रु. 10,000 एवढे शुल्क आकारण्यात आले होते. त्यात रात्रीचे भोजन, मद्य (अमर्यादित) व इतर खाणे, पिणे यांचा समावेश होता, अशी माहिती सुत्रांनी दिली. ‘सनबर्न’ पार्टी 30 डिसेंबर रोजी संपुष्टात आली तरी इतर पार्ट्या मात्र 31 डिसेंबर रात्रभर चालू होत्या अशी माहिती उपलब्ध झाली आहे.