शहर परिसरात लग्न सोहळ्यांची धामधूम
बाजारात वाढली उलाढाल, वधू-वर पक्षाची लगीनघाई : अनेक जोडपी विवाह बंधनात
बेळगाव : शहर परिसरात विवाह सोहळ्याची धामधूम पहावयास मिळत आहे. मे महिन्यातील 10, 11, 13, आणि 16 तारखेला लग्न मुहूर्त असल्याने वधू-वर पक्षांची लगीनघाई सुरू झाली आहे. विशेषत: लग्नसराईमुळे बाजारपेठेत खरेदीला जोर येऊ लागला आहे. त्यामुळे उलाढालही वाढली आहे. लग्न सोहळ्यामुळे रस्ते आणि मंगलकार्यालयेही फुल्ल होऊ लागली आहेत. विशेषत: मंडप डेकोरेटर्स, साऊंड बॉक्स आणि स्वयंपाक्यांचीही रेलचेल पहावयास मिळत आहे. भटजी मंडळींनाही मागणी वाढू लागली आहे. एप्रिल महिन्यात लग्न सोहळे झाले होते. त्यानंतर आता पुन्हा मे महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात लग्नाचा धुमधडाका पहावयास मिळत आहे. लग्नाच्या मुहूर्तावर अनेक जोडपी विवाह बंधनात अडकली जातात.
बाजारपेठेला बहर
लग्नसराईमुळे बाजारपेठेत खरेदीला ऊत येऊ लागला आहे. विशेषत: भांडी, कपडे, सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे लग्नसराईमुळे बाजारपेठेला बहर येत आहे. सकाळपासूनच लग्नाच्या खरेदीसाठी नागरिक दाखल होऊ लागले आहेत. गणपत गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, भेंडीबाजार, पांगुळ गल्ली, रामदेव गल्ली आदी ठिकाणी वर्दळ पहावयास मिळत आहे. लग्नसराईमुळे लग्नपत्रिका, बाशिंग, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची रेलचेलही पहावयास मिळत आहे. त्याबरोबर लग्नात आहेर म्हणून मिक्सर, कुकर, फॅन, भांडी आणि इतर साहित्याचीही खरेदी होऊ लागली आहे. लग्नसोहळ्यांमुळे बाजारपेठ आणि इतर ठिकाणी धामधूम दिसत आहे.