सहकाऱ्यांची गरज, उपदेशकांची नाही
विदेशमंत्री जयशंकर यांनी युरोपीय देशांना सुनावले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. याचदरम्यान विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी युरोप समवेत पूर्ण जगाला एक स्पष्ट आणि थेट संदेश दिला आहे. भारत जगात उपदेश देणाऱ्यांऐवजी सहकाऱ्यांच्या शोधात आहे, खासकरून स्वत:च्या घरी (भूमीवर) काही वेगळे आणि बाहेर काही वेगळे करणाऱ्या उपदेशकांची आम्हाला गरज नसल्याचे जयशंकर यांनी आर्क्टिक सर्कल इंडिया फोरमला संबोधित करताना म्हटले आहे.
परस्पर सन्मान आणि समंजसपणा दाखविणाऱ्या देशांसोबत भारत काम करू इच्छितो. काही युरोपीय देश अद्याप स्वत:ची मूल्ये आणि कार्यांदरम्यान अंतराला तोंड देत आहेत. जेव्हा आम्ही जगाकडे पाहतो, तेव्हा आम्ही भागीदारांचा शोध घेतो, उपदेशकांचा नव्हे. काही युरोपीय देश स्वत:च्या भूमीवर काही वेगळे करतात आणि उर्वरित जगाला केवळ उपदेश देतात. युरोप अद्याप या समस्येला तोंड देत असल्याचे जयशंकर म्हणाले. प्रामाणिकपणे वागणाऱ्या देशांसोबत भारत काम करू इच्छितो असे त्यांनी नमूद केले.
जर आम्हाला भागीदारी विकसित करायची असेल तर काही संवेदनशीलता, परस्पर हित आणि जग कशाप्रकारे काम करते याची जाणीव असणे गरजेचे आहे. याचा अर्थ भागीदारी यशस्वी होण्यासाठी दोन्ही बाजूंना परस्परांच्या गरजा आणि हितांना समजून घ्यावे लागेल असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
जगात कुठे काही घडल्यास...
विदेशमंत्री जयशंकर यांनी आर्क्टिक सर्कल इंडिया फोरममध्ये जगाच्या बदलत्या स्थितीवर प्रकाश टाकला. भारत आता एक महत्त्वपूर्ण देश ठरला आहे. जगात कुठे काही घडल्यास त्याचा प्रभाव भारतावर पडतो. जगात प्रतिस्पर्धा वाढत आहे आणि हे सोपे असणार नाही. अमेरिकेने स्वत:च्या भूमिकेत मोठा बदल केला आहे. चीन मात्र पूर्वीप्रमाणेच वागत आहे. जगात आता स्पर्धा तीव्र होणार असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.