आम्ही दोघी सीमेवरती
कोल्हापूर / सुधाकर काशिद :
महिलांनी फक्त घर सांभाळावं असे अजुनही अनेक जण म्हणतात आणि म्हणतही राहणार. पण त्यांना माहित नाही की देशाच्या सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बी.एस.एफ.) असतो. देशाची सीमा निर्मनुष्य असते. आला तर शत्रुच तेथे येऊ शकतो. आणि त्या ठिकाणी जागता पहारा ठेवण्यात आम्हा महिलांचाही ताकदीचा वाटा असतो. बीएसएफ च्या जवान मयुरी साताप्पा पवार व पूजा बाळासाहेब चव्हाण दोघी ‘तरुण भारत संवाद’शी बोलत होत्या.
या दोघी आपल्या कोल्हापूर जिह्यातील गिरगाव ( ता. करवीर ) या गावच्या. गिरगाव या छोट्याशा गावाला 1857 च्या बंडापासूनचा इतिहास आहे. कारण या गावच्या फिरंगोजी शिंदे यांचा 1857 साली कोल्हापूर संस्थां नच्या राजवाड्यात झालेल्या सशस्त्र बंडात मुख्य सहभाग होता त्याची शिक्षा त्याला बंदुकीच्या गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण करून देण्यात आली. तो हुतात्मा झाला आणि तेथून पुढे गिरगाव या गावाचा उल्लेख बंडाचे गिरगावअसा होऊ लागला. असा शौर्याचा इतिहास असलेल्या याच गावच्या मयुरी आणि पूजा या देशाच्या सरहद्दीवर बंदोबस्ताला आहेत. इतर बरोबर बंदोबस्त आणि देशाच्या सीमेवरचा बंदोबस्त यात खूप अंतर आहे. कारण नागरी वस्ती पासून देशाची सीमा खूप लांब असते. आणि या सीमेपलीकडे काही अंतरावर अन्य देशाची हद्द असते. या दोघी पाकिस्तान सीमेवर असल्यामुळे कायम ‘अलर्ट’. डोळ्याची पापणीही मिटवायची नाही इतकी तत्परता. यांची ड्युटी प्रत्येकी सहा सहा तासाची. जोडीला अन्य एक महिला जवानच असते. त्या त्या हवामानात गणवेशात थोडाफार बदल असतो. पण खांद्यावर कायम बंदूक. नजर सरहद्दीच्या पलीकडे. आणि हद्दीवर ठराविक अंतर पायी जाणे व परत येणे याचे टाईम टेबल ठरलेले असते. एक वेळ घड्याळ मागेपुढे होईल पण यांच्या ड्युटीत जराही शिथिलता येत नाही. आणि जराही कसूर होत नाही. कडक ऊन असेल तर उन्हात आणि शरीर गोठवून टाकणारी थंडी असली तरी गस्त घालण्यात जराही सवलत मिळत नाही. गस्तीचे अंतर किती हे ठरलेले असते. तेवढे अंतर हद्दीच्या तारे जवळून चालतच जावे लागते. आणि तेवढ्या अंतरासाठी दोन दोन महिला जवानांची जोडी असते. सोबत बिनतारी संदेश यंत्रणा असते. सीमेवर जराही काही वेगळे जाणवले तर लगेच नियंत्रण कक्षाला कळवावे लागते. खांद्यावरची बंदूक तर एंव्हाना त्यांच्या शरीराचाच एक भाग झालेली असते.
खरी कसोटी हिवाळ्यात असते. उणे सहा-सात इतक्याखाली तापमान आलेले असते. आणि अंग गरम ठेवून नव्हे तर जिद्द ताजी तवानी ठेवून ड्युटी पूर्ण केली जाते. वरिष्ठांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन शंभर टक्के करावे लागते.
हा झाला ड्युटीचा भाग पण सरहद्दीवर शरीर असले तरी नक्कीच त्यांचे मन गावाकडे कुटुंबाकडे पती मुलाकडे अधुनमधुन धाव घेत असतेच. खिशात ठेवलेल्या कुटुंबाच्या फोटोला अधून मधून बाहेर काढून डोळे भरून पाहावे लागतेच. आणि मोबाईलची रेंज मिळत असेल तर ड्युटी संपल्यावर घरच्याशी संपर्क साधने शक्य होते. काही ठिकाणी नेटवर्कही ठराविक कालावधीसाठी चालू किंवा बंद ठेवले जाते. मोबाईलवर घरच्यांशी बोलता येते. पण ‘आम्ही इकडे सीमेवर ऊन ,पाऊस थंडीत .आणि तुम्ही तिकडे आरामात गावात घरात’ असे भावनिक बोलणे टाळले जाते. ड्युटी म्हणजे ड्युटी एवढेच मेंदूला फिट झालेले असते.
सरहद्दीवर कॅम्पमध्ये अन्यही प्रांतातील महिला जवान असतात. साधारण प्रत्येकीची मानसिकता एकमेकीला आधार देण्याचे असते. घराकडची आठवण येत नाही असे अजिबात होत नाही . पण त्यावेळी स्वत:ला कसे सावरायचे हे देखील ठरवून गेलेले असते. या ड्युटीवर्षाला 75 दिवस सुट्टी असते ती टप्प्याटप्प्याने घेता येते. सणासुदीला कॅम्पवर वेगळे गोडधोड जरूर असते. देशाच्या अनेक भागातील महिला असल्याने सण वारांचे वैविध्य अस. ते आणि ते सामूहिक साजरे करणे शक्य होते. गणेश चतुर्थीला आरती केली जाते. दिवाळीला मेणबत्त्यांची आरास होते .शुभेच्छांची देवाण-घेवाण होते. भारत म्हणजे काय त्याची अखंडता म्हणजे काय हे कळते. त्याची सुरक्षा करण्याची संधी आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून मिळाली ही त्यांना सुवर्णसंधी वाटते. आणि महिला म्हणजे चूल मूल यापेक्षाही एक वेगळी संधी त्यांना त्यांचा आत्मसन्मान वाढवून देते.