खानापूर शहराचा पाणीपुरवठा आजपासून सुरू
नागरिकांनी पुढील आठ दिवस पाणी पिण्यासाठी वापरु नये, नगरपंचायतीचे ग्रामस्थांना आवाहन
खानापूर : खानापूर शहराचा पाणीपुरवठा मंगळवारपासून सुरू करण्यात येणार असून नगरपंचायतीने पाणीपुरवठ्याबाबत सर्व यंत्रणा सिद्ध केली आहे. याबाबत गेल्या चार दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा यंत्रणा तसेच पाणी शुद्धीकरण यंत्रणेची स्वच्छता तसेच पाणी शुद्धीकरण करण्यासाठी नव्याने बेड व्यवस्था करण्यात येत होती. यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी उशीर झाला. तसेच नागरिकांनी पुढील आठ दिवस पिण्यासाठी पाणी वापरु नये, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे. मागीलवर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने नदीचे पाणी पूर्णपणे कमी झाले होते. गेल्या काही महिन्यापासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मलप्रभेचे पात्र प्रवाहित झाल्याने नागरिकांतून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत होती. नगरपंचायतीकडून जॅकवेल तसेच पाणी शुद्धीकरण यंत्रणेची स्वच्छता आणि इतर तांत्रिक नियोजनासाठी गेल्या आठ दिवसांपासून काम करण्यात येत होते. त्यामुळेच खानापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिरंगाई झाली असल्याचे स्पष्टीकरण नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
पाईपमध्ये दूषित पाणी
पाणीपुरवठा यंत्रणा संपूर्णपणे कार्यरत झाली असून मंगळवार दि. 18 पासून शहराचा पाणीपुरवठा यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात येणार असून संपूर्ण शहराला मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यापासून पाणीपुरवठा बंद असल्याने पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी शिल्लक राहिल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुढील आठ दिवस नागरिकांनी पाणी फक्त इतर वापरासाठी उपयोग करावा, पुढील आठ दिवसानंतर पिण्यासाठी वापरण्यात यावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.