Sangli News | नदी उशाला अन् कोरड घशाला! सांगलीतील 'या' ३ गावांचा पाणीप्रश्नावरून पाटबंधारे विभागाला निर्वाणीचा इशारा
सांगली : बुधगाव, माधवनगर,पदमाळे, या तीन गावांचा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसापासून ठप्प झाला आहे. कृष्णानदी कसबे डिग्रज बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला म्हणजे सांगली बंधाऱ्याचे पाणी कमी झाल्यामुळे या तीन गावांना प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात फटका बसतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे.
तीन गावातील काही ग्रामस्थांनी या मागणीचे निवेदन सांगली पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांना दिले. सांगली शहरालगत नदीकाठाला असणारी ही तीनही गावे नेहमी पाण्यावाचून बंचित राहतात. चार दिवस पाणी नसल्याने अधीक्षक अभियंता पाटोळे यांना फोनवरून ही बाब सांगितली.
त्यांनी त्वरित पावले उचलत कोयना धरणातून सकाळी ११ वाजता १०५० क्युसेस विसर्ग सुरू केला आहे. परंतु साठपेवाडी, नागठाणे येथे अडवलेले पाणी सोडल्याचेही समजते त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्र गंभीर बनला असल्याचे म्हटले आहे.
बुधवारी कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांना निवेदन देण्यात आले. हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी कसबे डिग्रजच्या बंधाऱ्यावर पाणी उपसा करावा, अशी मागणी करण्यात आली. कसबे डिग्रज बंधाऱ्यात पाणी उपसा पंप बसवावा. त्याचा आराखडा तयार करावा अशी मागणी सदस्य मनोहर पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी केली. यावेळी उत्तम निवृत्ती पाटील, बाबुराव भगत, आनंदा भगत, सुभाष बाबर, महादेव पाटील, रामचंद्र शिंदे, तानाजी पाटील, उपस्थित होते.