50 गावांमध्ये 87 टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ‘पाणीबाणी’ परिस्थिती : भाडेतत्त्वावर कूपनलिका घेऊन पाणीपुरवठा
बेळगाव : घटलेल्या पावसाच्या प्रमाणामुळे यंदा जिल्ह्यामध्ये ‘पाणीबाणी’ परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत यंदा जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या खानापूर तालुक्यातही पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील 50 गावांना 87 टँकरने व भाडेतत्त्वावर कूपनलिका घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे. मे अखेरपर्यंत परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे प्रशासन दमदार वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यंदा संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांश भागात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. हीच परिस्थिती बेळगाव जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्ह्यांत 11 तालुक्यांतील 50 गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याने त्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे 5 टँकर व 82 खासगी पाणीपुरवठा टँकर भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. अथणी तालुक्यातील 18 गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी 49 टँकरद्वारे दररोज 121 ट्रीप पाणीपुरवठा केला जात आहे. रायबाग तालुक्यातील 19 गावांमध्ये 24 टँकरने दररोज 91 ट्रीप पाणीपुरवठा केला जात आहे. ग्राम पंचायतीकडून गावासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता खोदण्यात आलेल्या कूपनलिकांचे पाणी कमी झाल्याने खासगी कूपनलिका भाडेतत्त्वांवर घेण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. त्यानुसार खासगी कूपनलिका घेऊन काही गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
आवश्यक प्रमाणात निधी उपलब्ध
पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आवश्यक प्रमाणात निधी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. हा पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी टँकर घेणे गरजेचे बनले आहे. मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यामध्ये 50 गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. एप्रिल व मे हे दोन महिने पाणी समस्या अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहे. वळीव पाऊस दमदार झाला तर पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ होऊन समस्या दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
49 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील 49 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामध्ये अथणी 13, बैलहोंगल 6, बेळगाव 3, चिकोडी 3, हुक्केरी 1, खानापूर 4, रामदुर्ग 1, रायबाग 13, सौंदत्ती 1, कित्तूर 1, मुडलगी 3 तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
टँकरने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांची संख्या
- तालुके गावांची संख्या
- अथणी 18
- बेळगाव 1
- चिकोडी 4
- हुक्केरी 2
- खानापूर 3
- रायबाग 19
- मुडलगी 3
- एकूण 50