जिल्ह्यातील 84 गावांना टँकरने पाणीपुरवठा
उन्हाच्या झळा, दुष्काळाची तीव्रता वाढली
बेळगाव : वाढते ऊन व दुष्काळ याच्या झळा सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांत पाणी टंचाई निर्माण झाली असून 84 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गुरुवारी रात्री ही माहिती दिली आहे. अथणी तालुक्यातील सर्वाधिक 28 गावांना तर रायबाग तालुक्यातील 19 गावांना, बैलहौंगल तालुक्यातील 10 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यातील 7, चिकोडी तालुक्यात 5, खानापूर तालुक्यातील 4, मुडलगी, रामदुर्ग तालुक्यात प्रत्येकी 3, हुक्केरी तालुक्यातील 2, गोकाक, सौंदत्ती, कित्तूर तालुक्यातील प्रत्येकी एक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवार दि. 4 एप्रिल रोजी 84 गावांना 107 टँकरने पाणी पुरविण्यात आले आहे. एकूण 336 टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. सरकारने 25 खासगी कूपनलिकेतून पाणी उपसा करून ते नागरिकांना पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात एकूण 1428 कूपनलिका निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी 563 खासगी कूपनलिका मालकांबरोबर पाण्यासाठी करार करण्यात आला आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन अथणी तालुक्यातील ककमरी, अनंतपूर व चिकोडी तालुक्यातील बेळकूड या तीन ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. 36,900 चाऱ्याचे कीट पशूसंगोपन खात्याकडून उपलब्ध झाले आहेत. ते 14,414 शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.