Koyna Dam Water Level | कोयनेचा जलसाठा ऐतिहासिक पातळीवर खालावला; अवघे ९ TMC उपयुक्त पाणी, राज्यावर वीजसंकट घोंगावणार?
सातारा - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि राज्याचे मुख्य ऊर्जाकेंद्र मानल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील पाणीसाठ्याची अवस्था चिंताजनक झाली आहे.जून महिना अर्धा संपत आला तरी मान्सूनने दडी मारल्यामुळे धरणातील उपयुक्त जलसाठा अवघा ९.०१ टीएमसी इतका कमी झाला आहे. ही मागील १२ वर्षांतील सर्वात निच्चांकी पाणी पातळी आहे. यापूर्वी २०१४ मध्ये उन्हाळ्याच्या शेवटी धरणातील पाणीसाठ्याची अशीच स्थिती झाली होती.
त्यावेळी १६ जून २०१४ रोजी कोयनेत फक्त ९.२० टीएमसी पाणीसाठा होता.सन १९६१ पासून आत्तापर्यंत कोयना धरणाचा इतिहास पाहिला तर धरणातील एकूण पाणीसाठा १४ टीएमसी किंवा त्यापेक्षा खाली जाणे ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. कोयना धरणात ५.२५ टीएमसी पाणी हे 'मृत साठा" म्हणजेच न वापरता येणारे पाणी असते. त्यामुळे १६ जून रोजी धरणातील एकूण साठा १४.१३ टीएमसी झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वापरण्यासाठी केवळ ९ टीएमसी उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे. धरणाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत जून महिन्यात एकूण पाणीसाठा १४ टीएमसीच्या जवळपास किंवा त्यापेक्षा कमी पाणीसाठा अनेक वर्षी गेला होता.
अत्यंत तीव्रउन्हाळा आणि मान्सून महिनाभर लांबल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमालीचा आटला आहे.यापूर्वी १३ जून २०२३, २७जून २०१९, १८ जून १९९६ यावर्षी जूनच्या उत्तरार्धात तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी घरणात १० टीएमसीच्या जवळपास पाणीसाठा होता. मात्र १९७२-७३ साली सर्वात भीषण दुष्काळाच्या जनतेला झळा पोहोचल्या. त्यावेळी जून १९७३ मध्ये धरणातील एकूण पाणीसाठा ९.५० ते १० टीएमसीच्या दरम्यान खाली आला होता.