आलमट्टीच्या 14 दरवाजांतून विसर्ग
वार्ताहर /जमखंडी
आलमट्टी धरणाचे 26 पैकी 14 दरवाजे उघडण्यात आले असून 65 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 519.6 मीटर व 123.081 टीएमसी क्षमतेच्या आलमट्टीत 17 रोजी पाण्याची पातळी 518.11 मीटर होती. पाण्याची आवक 81 हजार 333 क्युसेक तर विसर्ग 65 हजार क्युसेक करण्यात आला आहे. सध्या धरणात 99.317 टीएमसी पाणी संग्रह असून धरण 80.69 टक्के भरले असल्याची माहिती जमखंडी उपविभाग अधिकारी श्वेता बिडीकर यांनी दिली. आलमट्टी व नारायणपूर धरणात मुबलक प्रमाणात पाणी संग्रह होत असल्याने 17 पासून सर्व कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय बेंगळूर येथील विकाससौधमध्ये जल सल्लागार समितीच्या मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस मंत्री शिवानंद पाटील, शरण बसप्पा दर्शनापूर, खासदार राधाकृष्ण दोडमणी, आमदार यशवंतगौडा पाटील, जे. टी. पाटील, प्रकाश राठोड, पी. एच. पुजार, विजयानंद काशाप्पानावर आदी उपस्थित होते.