आरटीओ सर्कलमध्ये पाण्याची गळती
हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांतून तीव्र संताप
बेळगाव : शहरातील गजबजलेल्या आरटीओ सर्कल परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने वाहनधारकांसह नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे अशाप्रकारे पाणी वाया जाणे ही गंभीर बाब आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित कंत्राटदाराकडून गळती काढण्याची सूचना देण्याची मागणी होत आहे.
आरटीओ सर्कल हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा चौक असून येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पाणी गळतीमुळे रस्त्यावर पाणी साचत असून त्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत. दुचाकीस्वार घसरून पडण्याची भीती निर्माण झाली असून पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर पेव्हर्स असल्याने रस्त्यालाही धोका निर्माण झाला आहे. यासाठी लवकरात लवकर काम हाती घेण्याची आवश्यकता आहे.
महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने या गळतीची दुऊस्ती करून पाण्याची होणारी नासाडी थांबवावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नियमित तपासणी करावी. पाणी ही मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून तिचा योग्य वापर होण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने पावले उचलण्याची गरज आहे. पाण्याची गळती होत असल्याने या परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसून येत आहेत. हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.