कुडची पुलावर दुसऱ्यांदा पाणी
वाहतूक ठप्प : पाणलोट क्षेत्रातील पावसाचा परिणाम
त. भा. वार्ताहर
कुडची : पश्चिम महाराष्ट्र व नदीकाठावरील प्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रात वाढलेल्या पाण्यामुळे कुडची पुलावर पाणी आले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अन्य मार्गाने वाहतूक वळविली आहे.
कृष्णा नदीच्या पात्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून वाढत असलेल्या पाण्यामुळे कुडची-उगारखुर्द येथील पुलावर दुपारपासूनच पाणी येण्यास प्रारंभ झाला. दहाच्या सुमारास पाण्याची पातळी वाढल्याने कुडची पोलीस व महसूल विभागाच्यावतीने ईदगाहजवळ बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे रस्ता बंद झाल्याने अनेक चारचाकी व दुचाकीस्वारांना पोलिसांनी परत पाठविले. कुडची पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. नदीच्या पात्रात पाणी वाढतच असून पुलावर सध्या सुमारे दोन ते अडीच फूट पाणी आले आहे.कुडची येथील कृष्णा नदीवरील पुलावर पाणी आल्याने जमखंडीकडून मिरज, सांगलीकडे जाणारी वाहतूक हारुगेरी क्रॉसवरून अथणी मार्गाने तर रायबाग व चिंचलीकडून येणारी वाहतूक अंकली मार्गाने वळविण्यात आली आहे.
जमखंडी, रबकवी, बनहट्टी, मुधोळ, हारूगेरीकडून येणारे नागरिक कुडचीपर्यंत येऊन येथून रेल्वेने मिरज, सांगलीकडे प्रयाण करत असल्याने रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी दिसून येत आहे.
कुडची पुलावर पाणी येऊन वाहतूक बंद झाल्यानंतर रायबागचे तहसिलदार महादेव सन्मूरे यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. यावेळी बोलताना तहसीलदार सन्मूरे यांनी कृष्णा नदीकाठावरील येणाऱ्या 12 गावांत पुराची स्थिती निर्माण झाल्यास सरकारी यंत्रणा तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक गावात तालुकास्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच त्या गावातील तलाठी, पीडीओंसह अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या तरी पुराची स्थिती नियंत्रणात असून महापूर आला तरी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अचानक पुलावर पाणी आल्याने अनेक वाहनधारक व नागरिकांची गोची झाली.