पाणी आटले...जलचरांना धोका!
नदी, तलाव, जलाशयांच्या पाणी पातळीत घट : मासे मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना
बेळगाव : नदी, तलाव, जलाशयांच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याने जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी नद्या आणि तलाव आटल्याने मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे जलचर प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काही ठिकाणी दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मत्स्य खाते कोणती भूमिका घेणार? हे पहावे लागणार आहे. जिल्ह्यातील रायबाग, कागवाड आणि अथणी तालुक्यांमधून वाहणाऱ्या कृष्णा नदीत मासे दगावण्याचा प्रकार घडला आहे. त्याबरोबर इतर ठिकाणी तलाव, नदी आणि जलाशयांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होवू लागली आहे. त्यामुळे मासे, कासव, मगर, खेकडे, बेडूक आदी जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. तर काही ठिकाणी नदी आणि तलाव कोरडे पडल्याने मासे आणि इतर जलचर प्राणी तडफडून दगावत आहेत. गतवर्षी पावसाळा कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे नदी, तलाव आणि जलाशयांची पाणी पातळी कमी होवू लागली आहे. त्याबरोबर वळिवाने देखील हुलकावणी दिली आहे. वाढत्या उष्म्यामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे विहिरी, नदी, तलाव आणि जलाशयांची पाणी पातळी घटू लागली आहे. परिणामी यामध्ये असलेल्या जलचरांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे.
वनप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती
जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मानवाबरोबर पाळीव प्राण्यांनाही पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. त्याबरोबर वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सध्या एप्रिल महिन्यात पाणी टंचाई अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. नदी, तलाव आणि जलाशयांच्या पाणी पातळीत घट झाल्याने जलचर प्राण्यांच्या सुरक्षिततेचा, संवर्धनाचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
मगरी नदीपात्राच्या बाहेर
विशेषत: कृष्णा नदी काही ठिकाणी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीतील मगरी अन्नाच्या शोधात नदीकाठी फिरू लागल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. नदीमध्ये महाराष्ट्राने पाणी सोडावे, अशी मागणी कर्नाटक शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत 10 कि. मी. पर्यंत कृष्णा नदी कोरडी पडली आहे.पाणी आटल्याने लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.
हिडकल, राकसकोप जलाशयातील माशांची पिल्ले सुस्थितीत
जिल्ह्यात काही ठिकाणी नदी आणि जलाशयांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. हिडकल, राकसकोप आणि इतर ठिकाणी सोडलेली माशांची पिल्ले सुस्थितीत आहेत. तलावांतून देखील पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ पाणी कमी झालेल्या ठिकाणीच अडचणी आहेत.
- वसंत हेगडे (सहसंचालक मत्स्य खाते)