रेशनच्या तांदळाची नासाडी सुरूच
वाहतुकीदरम्यान तांदूळ रस्त्यावर, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे दुर्लक्ष
बेळगाव : अन्नभाग्य योजनेतील धान्याची वाहतुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे. त्यामुळे लाभार्थी आणि सर्वसामान्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. मासिक रेशनचा साठा कमी येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तर दुसरीकडे वाहतुकीदरम्यान ट्रकमधून मोठ्या प्रमाणात रेशनची नासाडी होऊ लागली आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खाते गांभीर्याने घेणार का? असा प्रश्नही पडू लागला आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती 5 किलो धान्य वितरीत केले जात आहे. दर महिन्याला फुड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात या धान्याची साठवणूक केली जाते आणि तेथून पुढे तो कर्नाटक फुड कार्पोरेशन गोदामाकडे पाठविला जातो. या वाहतुकीदरम्यान या धान्याची नासाडी होऊ लागली आहे. त्याबरोबर गोदामातून रेशन दुकानदाराच्या दुकानापर्यंत पोहोचेपर्यंत धान्य रस्त्यात पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. वाहतुकीदरम्यानही मोठ्या प्रमाणात रेशन वाया जात आहे. पोत्यांची शिलाई व्यवस्थीत नसल्याने रेशनच्या धान्याची नासाडी होऊ लागली आहे. याचा परिणाम रेशन दुकानदारांकडे धान्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनाही फटका बसू लागला आहे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती 170 रुपये देऊ केले आहेत. त्याबरोबर माणसी 5 किलो धान्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांकडेही मोठ्या प्रमाणात रेशनधान्याचा साठा येऊ लागला आहे. मात्र या रेशनची वाहतूक करताना आणि तांदूळ चढ-उतर करताना नासाडी होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेषत: गोदामातून रेशनदुकानापर्यंत येताना रस्त्यात तांदुळ पडण्याचे प्रकार घडू लागले आहेत. या प्रकाराबाबत संताप व्यक्त होऊ लागला आहे. रेशन दुकानदारांना कमी धान्याचा पुरवठा होत असल्याने लाभार्थ्यांना एक-दोन किलो कमी धान्य वितरीत केले जात आहे. त्यामुळे फटका बसू लागला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशनच्या वाहतुकीकडे लक्ष देवून नासाडी थांबवावी, अशी मागणीही होऊ लागली आहे.
वाहतुकीमुळे तांदळाचा तुटवडा...
रेशनच्या वाहतुकीदरम्यान नासाडी होत आहे. त्यामुळे रेशनदुकानदारांना तांदळाचा तुटवडा पडत आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे विनाकारण तांदूळ वाया जात आहे.
- राजशेखर तळवार (रेशन दुकानदार मालक संघटना, राज्यउपाध्यक्ष)