गणपतीच्या आधी रस्ता खड्डेमुक्त न केल्यास १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा
रत्नागिरी :
शहराजवळील काजरघाटी धार ते आरटीओ कुवारबाव नाका रस्त्यावर खड्ड्यांनी अक्षरशः तांडव माजवला आहे. या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना चालकांना प्रचंड अडचण येत असून, अनेकदा अपघातही होत आहेत. या त्रासामुळे साईनगर येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आंदोलनाचा पवित्रा उचलला असून, १५ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उपोषणाचा इशारा दिला आहे.
काजरघाटी धार ते आरटीओ कुवारबाव नाका या रस्त्यावर वाहने सतत ये-जा करतात. मात्र, रस्ता खड्ड्यांनी तुडुंब भरल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला या समस्येबाबत सांगितले, मात्र अद्याप या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
गणपती उत्सव जवळ येत असून, या रस्त्याचा वापर ग्रामस्थांनी गणपतीचे आगमनासाठी करणार आहे. त्यामुळे गणपतीच्या आधी हा रस्ता खड्डेमुक्त करून दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली नाही तर साईनगरचे ग्रामस्थ १५ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उपोषणाला बसणार असल्याची गंभीर माहिती महेश नागवेकर, आशिष शिवलकर, मनोज भाटकर, साई विलणकर आणि कुवारबावचे माजी उपसरपंच नरेश विलणकर, चेतन पाटील यांनी दिली आहे.