विधानसभेत विजय, रोहन यांच्यात जुंपली
‘दृष्टी’संबंधी घोटाळ्याचे आरोप : कंत्राट संपले तरी मुदतवाढ : युरी,देश-विदेशातील दौऱ्यावर कोट्यावधी खर्च : आलेमाव, सरदेसाई यांचे आरोप मंत्री खंवटे यांनी फेटाळले
पणजी : राज्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पर्यटन खात्याने नियुक्त केलेली ‘दृष्टी’ ही संस्था चांगल्याप्रकारे काम करत असून राज्यात पर्यटकांना बुडून मृत्यू येण्याचे प्रकार बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत. तरीही गत दोन वर्षात ज्यांना बुडून मृत्यू आला त्या घटना एक तर या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या ड्युटी अवर पूर्वीच्या किंवा त्यानंतरच्या असाव्यात, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. अशावेळी आपणावर होत असलेले आरोप पूर्णपणे निराधार व बिनबुडाचे असल्याचेही ते म्हणाले. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या दृष्टी संस्थेवर सरकारकडून करण्यात येणारा खर्च हा घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच आमदार विजय सरदेसाई यांनी केला होता. त्या आरोपांचे खंडण करताना श्री. खंवटे बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी देश-विदेशातील रोड शो वरूनही आपणावर आरोप होत असले तरी त्यातही तथ्य नसल्याचे ते म्हणाले. या रोड शोमुळे राज्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगताना कोविड महामारी काळात मात्र काही प्रमाणात पर्यटकांच्या संख्येत घट झाली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मध्यंतरी रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळेही विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली होती, असेही खंवटे यांनी सांगितले.
कंत्राट संपले तरीही दृष्टी कंपनीलाच पुन्हा-पुन्हा मुदतवाढ देण्यात येत असून हा प्रकार पाहता हे घोटाळ्याचेच प्रकरण असल्याचा गंभीर आरोप आलेमाव यांनी केला होता. तसेच या घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. दुसऱ्या बाजूने सरदेसाई यांनीही पर्यटनमंत्री ‘शॉन इव्हेंटस्’ नामक कंपनीवर मेहरनजर केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पर्यटन प्रोत्साहनासाठी पर्यटन खात्यातर्फे देश-विदेशातील दौरे व त्यावरील कोट्यावधी ऊपयांच्या खर्चाचा विषय उपस्थित केला होता. गत चार वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर रोड शोसाठी सुमारे 63 कोटी ऊपये खर्च करण्यात आले. मात्र त्याचा परतावा म्हणून तेवढ्या प्रमाणात पर्यटक आले नाहीतय याउलट शॉन कंपनीची वार्षिक उलाढाल मात्र 60 कोटीवर पोहोचली असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला होता. या सर्व आरोपांचे खंवटे यांनी खंडण केले व आलेमाव व सरदेसाई यांचे आरोप निराधार असल्याचे सांगितले.