पुन्हा एकदा युद्धाचा भडका
गेले तीन महिने अमेरिकेला प्रचंड प्रमाणात आर्थिक लाभ उठवता आला. अमेरिकेचे आर्थिक उत्पन्न प्रचंड वाढले, अमेरिकेने मोठ्या प्रमाणात वाढीव दरात तेलाची निर्यात केली. अब्जावधी डॉलरचा लाभ उठवीत अमेरिकेने आपली आर्थिक स्थिती मजबूत केली, हे अनेक राष्ट्रांच्या लक्षात आले नाही.
गेले काही दिवस शांत असलेल्या प्रदेशात पुन्हा एकदा इराण व इस्रायल यांच्या दरम्यान युद्ध सुरू झाले आहे. आजपर्यंत अमेरिकेला कधीही कोणत्याही युद्धात मान खाली घालावी लागली नाही, परंतु प्रथमच इराणने या युद्धात बाजी मारली आणि अमेरिकेलाच युद्ध थांबवण्याची गरज पडली. गेला महिना दीड महिना वातावरण शांत असताना नव्याने इराण आणि इस्रायलने कुरघोडी सुरू केली, त्यातच अमेरिकेने दोघांनाही शांत करण्याचे नाटकही चांगले रंगविले, मात्र त्यात अपयश आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धात उडी घेतली. इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आहे आणि त्यामुळेच गेले काही महिने युद्ध चालू राहिले. इराणने होर्मुझच्या सामुद्री धुनीजवळ अमेरिकेचे लष्करी हेलिकॉप्टर पाडल्यामुळे चवताळलेल्या ट्रम्प यांनी इराणवर हल्ले चढविले. परिणामी गेले काही दिवस शांत असलेल्या इराणने अमेरिकेचे तळ असलेल्या आखाती राष्ट्रांवर जोरदार हल्ले चढविले. अमेरिकेचा हे युद्ध चालूच ठेवण्याचा इरादा आहे, कारण या युद्धादरम्यान गेले तीन महिने अमेरिकेला प्रचंड प्रमाणात आर्थिक लाभ उठवता आला. अमेरिकेचे आर्थिक उत्पन्न प्रचंड वाढले, अमेरिकेने मोठ्या प्रमाणात वाढीव दरात तेलाची निर्यात केली. अब्जावधी डॉलरचा लाभ उठवीत अमेरिकेने आपली आर्थिक स्थिती थोडी मजबूत केली हे अनेक राष्ट्रांच्या लक्षात आले नाही. अलीकडेच अमेरिकेतील आर्थिक स्थिती या संदर्भात जी सरकारी माहिती उघड झाली त्यातून अमेरिकेला अब्जावधी ऊपयांचा लाभ तेल विक्रीतून झाला. हे युद्ध संपूच नये यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रयत्नशील आहेत. गेले काही दिवस युद्धामुळे जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे. अनेक राष्ट्रांना त्याचा जबरदस्त फटका बसलेला आहे. अमेरिकेने युद्ध स्थिती निर्माण केली आणि आता त्याचे गंभीर परिणाम अनेक देशांना भोगावे लागत आहेत. अमेरिकेने कित्येक राष्ट्रांकडे युद्धासाठी मदत मागितली, परंतु बहुतांश राष्ट्रांनी त्याकडे पाठ फिरवली. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात सर्व ठिकाणी अमेरिकेने आपले सैनिक तैनात केले आहेत. तरीदेखील तेथून तेलाचे जहाज बाहेर पडणार नाही याची दखल इराणने घेतली आहे. जागतिक पातळीवर त्याचे गंभीर परिणाम सध्या चालू आहेत. असे असले तरी युद्ध थांबविण्यासाठी कोणतेही ठोस उपाय घेतले जात नाहीत हे दुर्दैवाने सिद्ध झालेले आहे. अमेरिकेने इराणमध्ये मंगळवारी रात्री उशिरा इराणच्या दोन जलसाठ्यांवर बॉम्ब हल्ला चढवून त्यांचे दोन जलसाठे नष्ट करणे हा प्रकार म्हणजे मानवी मूल्य आणि पायाभूत सुविधांचे उल्लंघन करणे आहे. युद्धामुळे इराणचे अतोनात नुकसान झालेले आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना या युद्धामुळे झालेल्या आहेत, अनेक सैनिक मारले गेले, याशिवाय असंख्य निरपराध माणसे ठार झाली याला जबाबदार कोण? युद्धाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत, युद्ध चालू ठेवताना मानवी मूल्यांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पाणी हा मानवाधिकार आहे. ती अत्यंत जीवनावश्यक बाब आहे, एक वेळ तेल नष्ट केले तरी फारसा फरक पडत नाही परंतु जलसाठे नष्ट करून सर्वसामान्य जनतेला तडफडत ठेवणे हे कितपत योग्य? खरे तर इराण-इस्रायल यांच्या दरम्यान जे युद्ध प्रज्वलित ठेवण्यात अमेरिकेचा दुष्ट हेतू आहे आणि आपली बिघडलेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अमेरिकेने या दोन देशांमध्ये जे युद्ध लावून दिले आणि नंतर आपणही त्यात सहभागी होऊन इराणला धडा शिकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तो अमेरिकेच्या अंगलट आला. तोपर्यंत जगातील अनेक राष्ट्रांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. जागतिक पातळीवर होणारी बहुतांश युद्धे ही तेलासाठी होत आहेत. कालांतराने ती पाण्यासाठी होतील हे तेवढेच खरे आहे. तेलासाठी होणारे हे युद्ध विध्वंसकच आहे. दोन महिन्यांच्या शांततेनंतर आखाती राष्ट्रांमध्ये पुन्हा युद्धाचे सावट पसरले. अमेरिकेचा दुष्ट हेतू सफल करू द्यायचा नाही, असा चंग इराणने बांधलेला आहे आणि त्यातून इस्रायलने इराणवर सुरू केलेले हल्ले, त्यातून युद्धाची झालेली सुऊवात, हे सर्व पाहता युद्ध संपुष्टात येण्याऐवजी पुन्हा एकदा जोमाने सुरू झालेले आहे. हे युद्ध वाढत जाईल तेवढे जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचे सावट अधिक गडद होईल. अमेरिकेचा धंदा मात्र व्यवस्थित चालेल. युद्ध संपविण्यासाठी भारत, रशिया, चीन इंग्लंड व जपानसारख्या राष्ट्रांनी आता पुढाकार घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत अमेरिकेवर दबाव येत नाही तोपर्यंत हे युद्ध चालू राहील. अमेरिकेचे सर्वाधिक नुकसान झाले असले तरी देखील या युद्धाची संधी साधून जागतिक पातळीवर तेलाचे दर वाढवून ठेवले आहेत आणि त्याचा फटका अनेक राष्ट्रांना बसलेला आहे.