शेतकऱ्यांची कर्जमाफी करा : डीसीसी बँकेला निवेदन
बेळगाव : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आगामी राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी हितांची घोषणा करण्यात यावी. वाढते उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा, महागाई व नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँका, खासगी वित्तसंस्था तसेच सूक्ष्मवित्त संस्थांमधील कृषी कर्जमाफी करून प्रति एकर 2 लाख ऊपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी राज्य रयत संघ व हसिरू सेनेच्यावतीने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन डीसीसी बँकेला देण्यात आले. 2025-26 वर्षासाठी 3,300 एफआरपी जाहीर केली आहे. पहिला हप्ता दिला असून दुसरा हप्ता म्हणून 700 ऊपये तातडीने जमा करून उर्वरित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी. सर्व पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी सरकारने अनुदानाची तरतूद करावी. सरकारने आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मोठ्या अनुदानाची तरदूत करण्यात यावी.
ठिबक सिंचन व शेतीला पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात. उन्हाळा सुरू झाला असून शेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता आहे. डीसीसी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाढीव कर्ज देऊन ते संपूर्ण माफ करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.