काँग्रेस पक्षावर मतदारांचा दृढ विश्वास
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : तिन्ही मतदारसंघात विजयी होणार : भाजपच्या आरोपांना दिले प्रत्युत्तर
बेळगाव : बेळगाव, चिकोडी आणि कारवार लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चांगले वातावरण निर्माण होत आहे. मतदारांतून चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षावर मतदारांचा विश्वास निर्माण झाला आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या तिन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या मैदानात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता आपण वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. भाजपकडूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित केले जात आहेत. बाहेरचे, आतले असे बोलले जात आहे. भाजपकडून असे आरोप केले जात असल्याने आपण त्याला प्रत्युत्तर दिले आहे, असे त्यांनी सांगितले. भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांचा पत्ता निवडणुकीनंतर विरोधकांना शोधत जावा लागणार आहे, असे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी म्हटले आहे, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, निवडणुकीच्या निकालाची आपणही उत्सुकतेने वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिली. पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या दोन वेळा प्रचारासाठी येणार आहेत. बेळगाव, चिकोडी आणि कित्तूर येथे ते प्रचार करणार आहेत. महाराष्ट्रातील कोणकोणते स्टार प्रचारक येणार? याची यादी पक्षाच्या हायकमांडकडून तयार करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी, लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.