मतदारयादी अद्ययावत, पारदर्शक बनवावी
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची मागणी : निवडणूक आयुक्तांना लेखी निवेदन सादर
पणजी : लोकशाही प्रक्रिया टिकवून ठेवण्यासाठी मतदारयादी अद्ययावत आणि पारदर्शक राखणे अत्यावश्यक आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, केशव प्रभू, नवीन पै रायकर आणि पुंडलिक राऊत देसाई यांचा शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळाकडून मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. त्यात मतदार यादीत तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुढे बोलताना नाईक यांनी आम्ही निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याचा आदर करतो, आणि राज्यात अधिक विश्वासार्ह निवडणूक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोग सर्व मुद्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करेल असा विश्वास व्यक्त केला.
विद्यमान यादीत बोगस डुप्लिकेट आणि अपात्र मतदारांची नावे समाविष्ट असल्याच्या प्रमुख मुद्यासह अन्य अनेक संभाव्य सुधारणांवर प्रकाश टाकला. मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडण्याच्या मोहिमेला गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डुप्लिकेशन टाळणे तसेच मतदार यादीमध्ये अचूकता वाढविणे या उद्देशाने हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक मतदारसंघात मतदारयादीत एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे विखुरलेली व अनियमितता दर्शविणारी आढळली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर उपाय म्हणून ओळख आणि पडताळणी अधिक सक्षम करण्यासाठी घर क्रमांकानुसार मतदारांना गटबद्ध करण्याची शिफारस या निवेदनात करण्यात आली आहे.
अनेक मतदारसंघात वा विविध राज्यांमध्ये नावे असलेल्या मतदारांच्या डुप्लिकेट नोंदीबद्दल चिंता व्यक्त करताना या शिष्टमंडळाने, राज्याच्या जन्म आणि मृत्यु नोंदणीशी निवडणूक डेटाबेसचे एकीकरण करावे तसेच मतदारयाद्यांमध्ये स्वयंचलित सुधारणा सुलभ होण्याच्या उद्देशाने स्थलांतरित तसेच मृत मतदारांची नावे वगळण्यात यावी, अशी सूचना केली. अन्य गैरप्रकार दूर करण्यासाठी मतदार याद्यांचे राज्य आणि राष्ट्रव्यापी ऑडिट आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याव्यतिरिक्त शिष्टमंडळाने मागणी केली की मतदार यादीतील बदल, सुधारणा, दुऊस्ती आदी कामे एकतर्फी न करता बूथ लेव्हल एजंट्सशी सल्लामसलत करून करावी, असे सूचविले.
ही तर भाजपकडून फसवणूक
दरम्यान, अशाप्रकारे निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करणे हा भाजपचा फसवणुकीचा धंदा असून ही नाटके त्यांनी बंद करावी, अशी टीका रिव्होल्युशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी केली आहे. बनावट मतदारयादीसंदर्भात आम्ही यापूर्वीच निवडणूक आयुक्तांना निवेदन दिलेले आहे. त्याप्रश्नी आमचे आमदार विरेश बोरकर यांनी विधानसभेतही विषय मांडला होता. प्रत्यक्षात या याद्यांमध्ये भाजपनेच बनावट नावे घुसडलेली आहेत. ज्यावेळी आम्ही या नावांना विरोध केला तेव्हा याच पक्षाने आम्हाला नावे ठेवली होती. तेच लोक आता केवळ मतदारांच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी निवडणूक आयुक्तांना निवेदने सादर करत आहे. त्यामागे लोकांची सहानुभूती मिळविणे एवढाच हेतू आहे, असेही परब यांनी म्हटले आहे.