सरकारच्या योजनांवर मतदारांचा विश्वास
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : मृणाल हेब्बाळकर यांना मतदारांचे पाठबळ
बेळगाव : बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. दिवसागणिक प्रचाराला रंगत येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू असून मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा विजय निश्चित आहे. सरकारच्या योजनांवर मतदारांचा विश्वास आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारादरम्यान त्या बोलत होत्या. या लोकसभा मतदारसंघामध्ये 2014 मध्ये आपण निवडणूक लढविली होती. त्यावेळी प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे हा मतदारसंघ व मतदार चांगले परिचयाचे असून सध्या मंत्री पदावर असल्याने लोकांसाठी राज्य सरकारकडून विकासाभिमुख योजना राबविल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघात मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी प्रचार करताना मतदारांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या गॅरंटी योजनांमुळे अनेकांना मोठी मदत मिळत आहे.
महागाईमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना या योजना दिलासादायक ठरत आहेत. दुष्काळी परिस्थितीमध्ये जनतेसाठी या योजना वरदान ठरल्या आहेत. गृहलक्ष्मी, शक्ती योजना, अन्नभाग्य, गृहज्योती योजना आपल्याला नक्की साथ देतील. मतदारांना याची चांगली जाणीव असून आपल्याला पाठबळ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांतून सरकारच्या योजनांबद्दल चांगला प्रतिसाद व्यक्त केला जात आहे, ही जमेची बाजू असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलांमधून अत्याधिक आनंद व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच प्रचाराच्या ठिकाणी महिलांकडून आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला जात आहे. प्रत्येक गावात प्रचारावेळी मिळणारा प्रतिसाद व नागरिकांकडून केले जाणारे स्वागत हे पुढील विजयाचे द्योतक आहे, असाही त्यांनी विचार क्यक्त केला. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेकडूनच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासारखे नेतृत्व जिल्ह्याला पाहिजे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असेही मंत्री हेब्बाळकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे.