सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काँग्रेसला मत द्या
खडकलाट येथील प्रचारसभेत प्रियांका जारकीहोळी यांचे आवाहन
बेळगाव : काँग्रेस पक्षाकडून नेहमीच गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करण्यात आले आहे. या लोकसभा निवडणुकीत चिकोडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, मतदारांनी भरघोस पाठिंबा देऊन निवडून द्यावे. असे आवाहन चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकलाट येथे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या. मंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा विकास केला जाईल. यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षाला मतदान करावे. केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. मतदारांची घोर निराशा केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. परदेशातील काळा पैसा आणण्याचे दिलेले वचनही पाळण्यात आलेले नाही. केंद्र सरकारने बेरोजगारी आणि महागाई दिली आहे. केवळ खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली जात आहे. अशा सरकारला वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सत्तेत आणणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून पाच गॅरंटी योजनांची अमलबजावणी करून राज्यातील जनतेला दिलेले वचन पाळले आहे. असे प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले.
विकासकामाची जाणीव करून घ्या
यावेळी आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले काँग्रेस पक्षाकडून अनेक विकासकामे राबविण्यात आले आहेत मतदाराने चुकीचे पाऊल ठेवण्यापूर्वी काँग्रेस पक्षाने केलेल्या विकासकामांची जाणीव करून घ्यावी. मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळेच प्रकाश व गणेश हुक्केरी या स्तरावर येणे शक्य झाले आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच गेल्या 38 वर्षापासून निरंतर सेवा देण्यात येत आहे. मतदारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे. पुन्हा एकदा मतदार संघाच्या विकासासाठी प्रियांका जारकीहोळी यांना भरघोस मतदान करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, सतीश पाटील, विनोद पाटील, नासिर तहसीलदार, राकेश चिंचणे, माणिक पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.