विवेकानंदांचे भाषण आजही प्रेरणादायी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो प्रांतात आयोजित सर्वधर्म परिषदेत केलेले अद्भूत भाषण आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. स्वामी विवेकानंद यांनी ते भाषण 11 सप्टेंबरलाच केले होते. त्यामुळे बुधवारी या भाषणाचा 132 वा स्मरणदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणाचे महत्त्व पुन्हा एकदा आपल्या संदेशात विशद केले आहे. स्वामी विवेकानंदांच्या त्या प्रभावी भाषणामुळे ती सर्वधर्मपरिषद गाजली होती.
स्वामी विवेकानंदांचे ते भाषण त्यावेळी जगभरात गाजले होते. आजही त्या भाषणाचे स्मरण केले जाते. त्या सर्वधर्मपरिषदेत त्यांनी हिंदू धर्म कसा सर्वसमावेशक आहे आणि सर्व धर्मांचे सार त्यात कसे आहे, हे एका अल्पकाळ भाषणात उपस्थितांना समजावून दिले होते. त्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या अन्य धर्माच्या सर्व प्रतिनिधींनी त्यांचाच धर्म कसा इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे, हे ठसविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, स्वामी विवेकानंद यांनी सर्व धर्म हे ईश्वराप्रत जाण्याचे समान महत्त्वाचे मार्ग आहेत. त्यामुळे कोणताही धर्म अन्य धर्मापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असू शकत नाही, अशी हिंदू धर्माची विश्वव्यापक शिकवण असल्याचे निर्विवादपणे सिद्ध केले होते. हिंदू धर्माच्या दिव्यत्वाची प्रचीती देणाऱ्या त्या भाषणामुळे हिंदू धर्माचे जागतिक महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले तसेच स्वामी विवेकानंदांनाही जगातले एक थोर विचारवंत आणि धर्मज्ञानी म्हणून ख्याती मिळाली. 11 सप्टेंबर हा या भाषणाचा स्मरणदिन म्हणून साजरा केला जातो.