रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेतून ऐक्याचे दर्शन
पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ : प्रजासत्ताक दिन परेडमधील ‘महिला शक्ती’चाही गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या 109 व्या भागाद्वारे देशाला संबोधित केले. चालू वर्षातील हा पहिला मन की बात कार्यक्रम होता. याप्रसंगी प्रजासत्ताक दिनापासून ते राममंदिर प्राणप्रतिष्ठेपर्यंतच्या विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. यावषी आपल्या राज्यघटनेला 75 वर्षे कशी पूर्ण झाली हे पंतप्रधानांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर झालेल्या परेडमध्ये दिसून आलेल्या महिला सक्षमीकरणावरही भाष्य केले. तसेच विविध पुरस्कार, पदके आणि अवयवदान अशा विषयांवरही त्यांनी संबोधन केले
दोन दिवसांपूर्वी आपण सर्व देशवासीयांनी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. यावषी आपल्या राज्यघटनेबरोबरच सर्वोच्च न्यायालयालाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या लोकशाहीचे हे सण भारताला ‘लोकशाहीची माता’ म्हणून अधिक बळकट करतात. सखोल विचारमंथनातून संविधान तयार करण्यात आले असून त्याला जिवंत दस्तावेज म्हटले जाते, असे ते म्हणाले. राज्यघटनेच्या तिसऱ्या प्रकरणात नागरिकांच्या हक्कांची माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रभू रामाचे शासन प्रेरणादायी
प्रभू रामाचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, संविधानाच्या तिसऱ्या अध्यायाच्या सुऊवातीला आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मणजी यांच्या चित्रांना स्थान दिले होते. प्रभू रामाचे शासन आपल्या संविधानाच्या निर्मात्यांसाठीही प्रेरणास्थान असल्यामुळेच 22 जानेवारीला अयोध्येत मी ‘देव ते देश’, ‘राम ते राष्ट्र’ या विषयावर बोललो होतो. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देशातील करोडो लोकांना एकत्र केले. हा सोहळा देशाच्या ऐक्याचे दर्शन घडवणारा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरल्याचेही पंतप्रधान नमूद केले.
22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती पेटवून दिवाळी साजरी केली. मी देशातील जनतेला मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. त्यालाही लोकांनी उदंड दाद दिली. लोकांनी मला फोटोही पाठवले. मंदिरांच्या स्वच्छतेची भावना कायम राहावी, ही मोहीम थांबू नये, असे ते म्हणाले. सामूहिकतेची ही शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, यावेळी 26 जानेवारीची परेड अतिशय अप्रतिम होती, परंतु सर्वात जास्त चर्चा झाली ती परेडमधील महिला शक्तीची. केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांच्या महिला तुकड्यांनी कूच करायला सुऊवात केली तेव्हा सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. परेडमध्ये निघालेल्या 20 पथकांपैकी 11 पथके केवळ महिलांची होती. चित्ररथांमध्ये सर्व कलाकार महिला होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमात दीड हजार मुलींनी सहभाग घेतला. महिलांची ही किमया नेत्र दिपवणारी होती, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.