मणिपूरमध्ये हिंसाचार अद्याप सुरुच
वृत्तसंस्था /इंफाळ
ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये अद्यापही हिंसाचार होतच आहे. काही विद्यार्थ्यांनी गुरुवारी इंफाळमधील आरोग्य केंद्राला आग लावली. इंफाळमध्ये सध्या तणावरपूर्ण शांतता असून हिंसाचाराचा भडका केव्हाही होऊ शकतो, अशी स्थिती आहे. आरोग्य केंद्राच्या आगीत कोणी जखमी झाले नसले तरी, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपूर्वी येथे सुरक्षादले आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्या जोरदार चकमक झाली होती. या चकमकीत 100 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. सध्याचा हिंसाचार राज्याच्या सखल भागात आणि मैतेयी समाज बहुसंख्य असणाऱ्या भागात होत आहे. कुकी समाजाचे फुटीरतावादी हा हिंसाचार घडवून आणत आहेत, असा मैतेयींचा आरोप आहे.
दंगलखोरांनी इंफाळमधील इमा बाजारपेठेलाही आग लावली आहे. या स्थानी 300 विद्यार्थी आंदोलन करीत होते. मात्र, या घटनेतही कोणी जखमी झालेले नाही. परिसरात संचारबंदीचा आदेश देण्यात आलेला असूनही अनेक विद्यार्थी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करीत आहेत. आम्ही दीर्घकालीन संघर्षासाठी सज्ज आहोत. आम्ही न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 16 महिन्यांमध्ये मणिपूरचा नाश झाला आहे. कुकी दहशतवादी ड्रोन हल्ले करीत आहेत. राज्य सरकार मैतेयींना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे आता आम्ही स्वत:च स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सज्जता करीत आहोत. तसे करण्यावाचून आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन विद्यार्थी नेत्यांनी केले आहे.