महिलांवरील हिंसाचार चिंताजनक
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर : महिला आयोगाकडे अनेक तक्रारी
बेळगाव : महिलांवरील हिंसाचाराचे विविध प्रकार आजही वाढू लागले आहेत. त्यामध्ये अलीकडे पुन्हा लक्षणीय वाढ होत आहे. त्यात घरगुती हिंसाचाराची प्रकरणे आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना महिलांवरील हिंसाचार चिंताजनक बाब आहे. महिलांचे शोषण, कौटुंबिक हिंसाचार, प्राणघातक हल्ले आणि धमकी याबाबतच्या तक्रारी महिला आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. राज्यात मागील चार महिन्यात 7698 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1554 तक्रारी घरगुती हिंसाचाराशी संबंधीत आहेत. त्यामुळे महिलांवरील घरगुती हिंसाचार वाढल्याचेही समोर आले. यामध्ये धमकी, छळवणूक, हल्ले आणि इतर प्रकरणाचा समावेश आहे.
कोरोना काळात हिंसाचाराच्या प्रकारात घट झाली होती. त्यानंतर या प्रकरणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. महिला आयोगाकडे हुंडाबळी, हिंसाचार आणि इतर प्रकरणाचीही नोंद झाली आहे. महिलांवरील हिंसाचार ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. तीन पैकी एका महिलेला शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे हिंसाचार प्रकरणाबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. राष्ट्रीय महिला आयोगामध्ये (2024) एकूण 25743 तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये सन्मानाने जगण्याच्या अधिकारांच्या संबंधित 28 टक्के तर कौटुंबिक हिंसाचार 24 टक्के, हुंड्यासंबंधी 17 टक्के, तर हुंडाबळीच्या 292 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
नोकरदार महिलांवरील अधिक प्रकरणे
कौटुंबिक हिंसाचार आणि नोकरदार महिलांवर हल्ले वाढले आहेत, असे दिसून आले आहे. नोकरी करणारी महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असते. त्यामुळे तिला तिच्या हक्काबद्दल जागरुकता आहे. अशा कारणातूनच कौटुंबिक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यातूनच नोकरदार महिलांवर पती-पत्नी हिंसाचाराची प्रकरणे वाढीस लागली आहेत. हुंडा बळी, कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, लैंगिक छळ, हक्कांचे उल्लंघन अशा घटनांची महिला आयोगाकडे तक्रार करू शकतो.
मदतीसाठी हेल्पलाईन
महिला आयोगाने 2021 पासून 24 तास तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे. यामध्ये महिला संकटात सापडल्यास मदत होऊ शकते. शिवाय मदतीसाठी फोन करणाऱ्या महिलांना समुपदेशन दिले जाते.