आचारसंहिता उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना दिशानिर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणुक आयोगाने शुक्रवारी राजकीय पक्षांकरता दिशानिर्देश जारी केले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान शिष्टाचार आणि संयम राखणे तसेच मुद्द्यांवर आधारित चर्चेच्या गरजेवर यात जोर देण्यात आला आहे. पूर्वी नोटीस जारी करण्यात आलेल्या स्टार प्रचारक किंवा उमेदवारांना आचारसंहितेच्या वारंवार उल्लंघनासाठी कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
सोशल मीडियावर विरोधी उमेदवारांना बदनाम किंवा अपमानित करणारे किंवा इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी पोस्ट शेअर केली जाऊ नये. राजकीय पक्षांनी समाजात फूट पडेल अशाप्रकारच्या वक्तव्यांपासून दूर रहावे असे दिशानिर्देशांमध्ये म्हटले गेले आहे.
तसेच आयोगाने स्टार प्रचारक आणि उमेदवारांवर विशेष जोर देत त्यांना आदर्श आचार संहितेच्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष उल्लंघनाबद्दल सतर्क केले आहे. निवडणूक आयोग आगामी निवडणुकीच्या काळात वेळ अणि सामग्रीसंबंधी देणाऱ्या नोटीसवर पुनर्विचार करण्यासाठी आचारसंहितेच्या उल्लंघनांना विचारात घेणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आयोगाकडून जारी झालेले निर्देश
-जात किंवा सांप्रदायिक भावनांच्या आधारावर आवाहन न करण्याची सूचना करण्यात आली आहे.
-मतभेद वाढविणाऱ्या किंवा विविध समुहांना परस्परांमध्ये शत्रुत्वाविषयी चिथावणी देणाऱ्या कृत्यांमध्ये सहभाग नको.
-मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने असत्य वक्तव्ये आणि निराधार आरोपांचा प्रचार करू नये.
-वैयक्तिक स्तरावरील शाब्दिक हल्ले टाळावेत आणि राजकीय भाषणादरम्यान मर्यादेचे पालन करावे.
-प्रचारासाठी मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वारा किंवा अन्य कुठल्याही पूजास्थळाचा वापर करू नये.
-महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेच्या विरोधात कुठलेही कृत्य किंवा वक्तव्य राजकीय पक्ष अन् उमेदवारांनी टाळावे.
-प्रसारमाध्यमांना खोट्या अन् भ्रामक जाहिराती देऊ नयेत.
-सोशल मीडियावर संयम बाळगावा, विरोधी उमदवारांची बदनामी करणाऱ्या पोस्ट टाळाव्यात.
-आयोगाने सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि उमेदवारांना आदर्श आचार संहित आणि कायद्यायच कक्षेत राहण्याची सूचना केली आहे.